Amit Shah | शिवाजी महाराजांच्या पवित्र रायगड किल्ल्यावर आयोजित पुण्यतिथी कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी रायगडविषयी महत्त्वाची घोषणा केली. रायगड किल्ला केवळ एक पर्यटनस्थळ न राहता, विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे स्थळ बनवण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यांनी सांगितले की, शिवाजी महाराजांचा जन्म, राज्याभिषेक आणि जीवनातील शेवटचा श्वास या तिन्ही ऐतिहासिक घटना याच भूमीवर घडल्या असून, ही भूमी केवळ इतिहास नव्हे तर राष्ट्राच्या स्वाभिमानाची साक्ष आहे.
रायगड किल्ला हा युवकांसाठी ऊर्जा- अमित शाह
कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी पुढे म्हटले की, सातवीपासून बारावीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी रायगडला भेट दिली पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून प्रेरणा घेतली पाहिजे. शिवाजी महाराजांचे कार्य समर्पण, बलिदान, शौर्य, स्वधर्म आणि स्वराज्याच्या विजिगीषेचे प्रतीक आहे. रायगड किल्ला हा युवकांसाठी ऊर्जा आणि चेतनेचे केंद्रबिंदू बनावा, असे सरकारचे उद्दिष्ट आहे.
अमित शाहांची मोठी घोषणा
अमित शाह यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वात शिवाजी महाराजांच्या आदर्शांनुसार देश पुढे जात असल्याचे सांगितले. काशी विश्वनाथ कॉरिडॉर, राम मंदिर यांसारखी ऐतिहासिक कामगिरी केवळ त्या विचारांची पुनर्स्थापना आहे. स्वातंत्र्याच्या शंभरव्या वर्षानिमित्त भारत जगातील पहिल्या क्रमांकाचा देश बनणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवरायांचा अंतिम संदेश कायम स्मरणात ठेवावा – स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषेसाठी लढा कधीही थांबता कामा नये, हे त्यांनी ठामपणे सांगितले होते. अफजलखान याचे नाव न घेता अमित शाह म्हणाले की, स्वतःला अलमगीर म्हणणारा एक व्यक्ती महाराष्ट्रात पराजित झाला आणि आज त्याची समाधीही याच भूमीत आहे, यावरून शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष पटते.
ते पुढे म्हणाले की, शिवचरित्र केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न ठेवता संपूर्ण देशाला आणि जगाला शिकवले पाहिजे. हे चरित्र प्रेरणादायी आहे आणि प्रत्येक भारतीयाने त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे, अशी विनंतीही त्यांनी केली.
Title : Raigad to Become National Inspiration: Amit Shah






