Pune Porsche Car Accident | पुण्यात गाजलेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात आरोपी विशाल अगरवाल याला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दणका बसला आहे. न्यायालयाने विशाल अगरवालचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्याचा कोठडीतील मुक्काम आणखी वाढला आहे. पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या या भीषण अपघातात दोन तरुण अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आपल्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी वैद्यकीय अहवालात छेडछाड केल्याचा आरोप विशाल अगरवालवर आहे.
या प्रकरणात अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलण्यात सहभाग असल्याचा आरोप असलेले डॉक्टर अजय तावरे (Dr. Ajay Tawre) यांचाही जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणात गुंतलेल्या सर्व आरोपींच्या अडचणी वाढल्या आहेत. (Vishal Agarwal Bail Rejected)
रक्तनमुने बदलण्याचा कट, हायकोर्टाचा स्पष्ट नकार :
19 मे 2024 रोजी पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एका भरधाव पोर्शे कारने दुचाकीवरून जाणाऱ्या अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोन अभियंत्यांना धडक दिली होती. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातावेळी कार चालवणारा तरुण 17 वर्षे 8 महिन्यांचा असून तो मद्यप्राशनाच्या अवस्थेत असल्याचे तपासात समोर आले होते. (Pune Porsche Car Accident)
या घटनेनंतर आरोपी अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी त्याचे वडील विशाल अगरवाल यांनी वैद्यकीय अहवालात छेडछाड करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. मद्यप्राशनाचे पुरावे नष्ट करण्यासाठी रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचे तपासात उघड झाले. या गंभीर आरोपांमुळे मुंबई उच्च न्यायालयाने विशाल अगरवालचा जामीन नाकारत कठोर भूमिका घेतली आहे. विशाल अगरवाल गेल्या 17 महिन्यांपासून तुरुंगात आहे.
Pune Porsche Car Accident | पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई :
या प्रकरणात पोलिसांकडून निष्काळजीपणा आणि आरोपीला मदत केल्याचा आरोपही समोर आला होता. येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पोलीस प्रशासनातही खळबळ उडाली होती.
अपघातानंतर सुरुवातीला बाल न्याय मंडळाने (JJB) अल्पवयीन आरोपीला अवघ्या 14 तासांत जामीन मंजूर केला होता. 100 शब्दांचा निबंध लिहिणे, समाजसेवा करणे आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे अशा अटी घालण्यात आल्या होत्या. या निर्णयावर देशभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.
यानंतर प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाची दिशा बदलली आणि आरोपींच्या अडचणी वाढत गेल्या. आता हायकोर्टाने जामीन फेटाळल्यामुळे या प्रकरणात कायदेशीर लढाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.






