Ajit Pawar : पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. निवडणुकीतील निकालावर राज ठाकरे यांनी संशय व्यक्त केला होता, त्यावर प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी “तुम्हाला तुमचा मुलगा निवडून आणता आला नाही आणि आम्हाला बोलता?” असा थेट सवाल करत राज ठाकरेंना टोला लगावला.
तुमच्या मुलाला लोकांनी निवडून दिलं नाही- अजित पवार
पुण्यात झालेल्या विभागीय आढावा बैठकीनंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत त्यांनी राज ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार टीका केली. मतदानाच्या टक्केवारीबाबत राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, “तुमच्या मुलाला लोकांनी निवडून दिलं नाही आणि तुम्ही आम्हाला शिकवताय?”
राहुल गांधींनी देखील मतदान प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, “जर काही शंका असेल, तर त्यांनी स्वतःची टीम पाठवावी आणि चौकशी करावी. पण दिल्लीचा निकाल 8 तारखेला लागणार आहे, म्हणून आता रडगाणं गायलं जात आहे,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
धनंजय मुंडे प्रकरण आणि शिवभोजन थाळी
कृषी विभागातील खरेदी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर कारवाई होणार का, असा प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी स्पष्ट केलं की, कोणतेही ठोस पुरावे नसताना कोणावरही कारवाई केली जाणार नाही. अंजली दमानिया (Anjali Damania) आणि धनंजय मुंडे या दोघांनीही आपली बाजू मांडली असून, त्यावर योग्य ती चौकशी होईल आणि त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल.
दरम्यान, शिवभोजन थाळी बंद होणार असल्याच्या चर्चांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “डीपीडीसीसाठी (DPDC) सर्व जिल्ह्यांना मागील वेळेपेक्षा अधिक निधी दिला जाणार आहे. अर्थसंकल्प अद्याप मांडला गेला नाही, त्यामुळे अशा अफवा पसरवू नयेत. शिवभोजन थाळी बंद होणार नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी चर्चांवर पूर्णविराम दिला.






