Israel Iran US War| गेल्या आठवड्याभरापासून अमेरिका-इस्रायल आणि इराण (Israel Iran US War)यांच्यात भयंकर युद्ध सुरू आहे. दिवसेंदिवस हे युद्ध अधिकच तीव्र होत चाललं आहे.युद्धामध्ये क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांची मालिका सुरू असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान झाल्याचं पाहयला मिळालं. या संघर्षामुळे संपूर्ण जगावर तिसऱ्या महायुद्धाचे ढग दाटले आहेत. अशातच हे युद्ध केवळ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच (PM Narendra Modi)थांबवू शकतात असा मोठा दावा संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) भारतातील पहिले उच्चायुक्त आणि माजी राजदूत हुसैन हसन मिर्झा यांनी केला आहे.
मोदींचा ‘तो’ एक कॉल कसा ठरेल निर्णायक?
हुसैन हसन मिर्झा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावावर भाष्य केले. त्यांच्या मते, “भारत एक महान देश आहे. पंतप्रधान मोदींचे इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांशी अत्यंत मजबूत आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मोदी नुकतेच इस्रायल दौऱ्यावर होते, तर दुसरीकडे भारत हा इराणचा सर्वात मोठा तेल खरेदीदार आहे. त्यामुळे मोदींनी केवळ एक फोन कॉल केल्यास या रक्तरंजित युद्धावर नक्कीच तोडगा निघू शकतो आणि हा विनाश थांबू शकतो.”
गेल्या 10-11 दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धात परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांच्या मृत्यूनंतर इराणने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मोजतबा खामेनेई (Mojtaba Khamenei) यांना इराणचा नेता मानण्यास नकार दिल्याने तणाव अधिकच वाढला आहे. इस्रायली सैन्याने नुकताच मध्य इराण आणि लेबनॉनमधील बेरूत (Beirut) येथील हिजबुल्लाहच्या (Hezbollah) तळांवर मोठा हल्ला केला आहे.
या युद्धात आतापर्यंत १३३२ जणांचा बळी गेल्याचे इराणच्या संयुक्त राष्ट्रातील (United Nations) राजदूतांनी सांगितले आहे. या संघर्षाची झळ युएईमधील ३५ लाख भारतीय समुदायाला बसू नये, अशी अपेक्षाही मिर्झा यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, युएई, कुवेत (Kuwait) आणि कतार (Qatar) यांसारख्या आखाती देशांनी आपल्या जमिनीचा वापर इराणविरुद्धच्या हल्ल्यांसाठी करण्यास नकार दिला आहे. अशा गुंतागुंतीच्या स्थितीत संपूर्ण जगाचे लक्ष आता भारताच्या पुढच्या पावलाकडे लागले आहे.






