PM Dhandhanya Krishi Yojana | देशातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने नुकतीच “प्रधानमंत्री धन-धन्य कृषी योजना” मंजूर केली आहे. या योजनेद्वारे देशातील १.७ कोटी शेतकऱ्यांना थेट फायदा होणार असून, सिंचन सुविधा, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, आणि साठवणूक क्षमता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर केली होती, आणि आता ती प्रत्यक्षात अमलात येणार आहे.
या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे? :
प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना ही शाश्वत, हवामान-लवचिक आणि आधुनिक शेतीला प्रोत्साहन देणारी योजना आहे. देशातील १०० जिल्ह्यांची निवड करण्यात येणार असून, त्या भागातील कमी उत्पादकता, मध्यम पीक तीव्रता आणि मर्यादित कर्ज उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा विशेष लाभ होणार आहे. (PM Dhandhanya Krishi Yojana)
या योजनेतून शेतीमालाच्या साठवणुकीसाठी पायाभूत सुविधा, सिंचन क्षेत्राचा विस्तार, सुधारित बियाणे, आधुनिक अवजारे यासाठी कर्ज व अनुदान देण्यात येणार आहे. त्याचबरोबर, महिला शेतकरी, कृषी स्टार्टअप्स, एफपीओ, सहकारी संस्था आणि स्वयंसहायता गटांनाही प्रोत्साहन दिलं जाणार आहे.
PM Dhandhanya Krishi Yojana | या योजनेचा फायदा कोणाला होणार? :
– अल्पभूधारक व सीमांत शेतकऱ्यांना उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आर्थिक मदत
– एफपीओ व कृषी सहकारी संस्थांना बाजारपेठ वाढवण्यासाठी साहाय्य
– शेती-तंत्रज्ञान स्टार्टअप्सना नवकल्पना राबवण्यासाठी संधी
– महिला शेतकरी आणि ग्रामीण स्वयंसहायता गटांना आर्थिक स्वावलंबनासाठी मदत
– ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आणि शेतीविषयक पायाभूत सुविधा सुधारणा
प्रधानमंत्री धनधान्य योजनेचे फायदे :
या योजनेच्या माध्यमातून पीक उत्पादन वाढ, बाजारातील थेट पोहोच, शाश्वत शेती प्रणाली, कपातीनंतरच्या नुकसानीवर नियंत्रण, आणि प्रगत शेती साधनांचे उपयोग यावर भर दिला जाणार आहे. विशेषतः पंचायत आणि जिल्हा पातळीवर साठवणूक आणि पुरवठा साखळी लॉजिस्टिक्स मजबूत केली जाणार आहे. (PM Dhandhanya Krishi Yojana)
शेतकऱ्यांना अल्पकालीन आणि दीर्घकालीन कर्जाच्या माध्यमातून सिंचन, बियाणे, अवजारे, खते, आधुनिक उपकरणे यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी सहाय्य करण्यात येणार आहे.






