Pune News | पुणे शहरातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने (Pune Railway) पुणे जिल्ह्यातील हडपसर येथून राजस्थानमधील जोधपूर शहरापर्यंत एक नवीन गाडी (New Train) सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, जी काही कारणास्तव रद्द करण्यात आली होती. आता ही गाडी पुन्हा एकदा पूर्ववत करण्यात आली आहे, ज्यामुळे हडपसर ते जोधपूर (Hadapsar Jodhpur Express) हा प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे.
युद्धजन्य परिस्थितीमुळे रद्द झालेली रेल्वे सेवा
भारत-पाकिस्तान युद्धजन्य (India Pakistan Tension) परिस्थितीमुळे आणि त्यामुळे देशाच्या सीमावर्ती राज्यांमध्ये जारी करण्यात आलेल्या हाय अलर्टमुळे, रेल्वे प्रशासनाने (Railway Administration) अनेक गाड्या रद्द करण्याचा किंवा त्यांच्या मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतला होता. राजस्थानसारख्या सीमावर्ती राज्यांमध्ये जाणाऱ्या अनेक गाड्यांवर निर्बंध घालण्यात आले होते.
याच पार्श्वभूमीवर, हडपसर – जोधपूर – हडपसर या नवीन गाडीची घोषणा झाल्यानंतरही, ती भारत-पाकिस्तान तणावामुळे रद्द करण्यात आली होती. तसेच, पुणे – जम्मू तावी – पुणे सेवा देखील थांबवून ती केवळ दिल्लीपर्यंतच चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता सीमेवरील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आल्याने आणि तणाव निवळल्याने, रेल्वे प्रशासनाने ही हडपसर – जोधपूर गाडी पुन्हा एकदा नियमितपणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवार, ११ मे २०२५ पासून ही सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. यासोबतच, थांबवलेली पुणे – जम्मू तावी – पुणे गाडी (Jammu Tawi Express) देखील आता दिल्लीपर्यंत न थांबता थेट जम्मू तावी या तिच्या अंतिम स्थानकापर्यंत धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यामुळे पुण्याहून जम्मूकडे जाणाऱ्या प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
नवीन एक्सप्रेस गाडीचे थांबे
हडपसर (Hadapsar) ते जोधपूर (Jodhpur) दरम्यान सुरू करण्यात आलेल्या या नवीन गाडीला मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. ही गाडी राज्याबाहेरील पाली, मारवाड, अबू रोड, पालनपूर, मेहसाणा, अहमदाबाद, वडोदरा, सुरत आणि वापी या स्थानकांवर थांबा घेणार आहे.
तर, महाराष्ट्र राज्यातील वसई रोड, कल्याण, लोणावळा आणि चिंचवड या महत्त्वाच्या स्थानकांवरही या गाडीला थांबा मंजूर करण्यात आला आहे. या नवीन गाडीमुळे पुणे आणि परिसरातील प्रवाशांना राजस्थान(Rajasthan) आणि गुजरात (Gujarat) या राज्यांमध्ये प्रवास करणे अधिक सोपे होणार आहे.






