Mumbai to Vadhvan | मुंबईकरांसाठी आणि राज्यातील लॉजिस्टिक क्षेत्रासाठी मोठी बातमी समोर आली आहे. दक्षिण मुंबईला प्रस्तावित वाढवण बंदराशी थेट जोडणारा मोठा मार्ग आता वेगाने आकार घेत आहे. या मार्गामुळे मुंबई ते वाढवण (Mumbai to Vadhvan) हा प्रवास अवघ्या 60 मिनिटांत होणार असून, सध्या लागणारा वेळ यापेक्षा अनेक पटीने कमी होणार आहे.
या प्रकल्पामध्ये 300 मीटर लांबीचा उन्नत पूल (Elevated Flyover) बांधला जाणार आहे. यामुळे एमएमआरडीएच्या उत्तन- विरार (Uttan Virar Sea Bridge) सागरी सेतूला वडोदरा-मुंबई द्रुतगती मार्गाशी (VME) थेट जोडणी मिळणार आहे. ही जोडणी पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते वाढवण हा मार्ग अगदी सरळ, वेगवान आणि सागरकिनारी अखंड असेल.
कसा असेल नवीन महामार्गाचा मार्ग? :
प्रस्तावित वाढवण बंदर हा भारतातील सर्वाधिक क्षमतेचा बंदर प्रकल्प असणार असून, तो जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (JNPA) उभारत आहे. या प्रकल्पासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) वरोर ते तवा जंक्शन असा विशेष महामार्ग बांधत आहे. (Mumbai to Vadhvan)
हा महामार्ग थेट वडोदरा–मुंबई द्रुतगती मार्गाला जोडणार आहे, आणि त्याच द्रुतगती मार्गाला उत्तन–विरार सागरी सेतू जोडण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण मार्ग समुद्रकिनाऱ्यावरून जाणाऱ्या एकात्मिक नेटवर्कमध्ये बदलणार असून, ही महाराष्ट्रासाठी महत्त्वाची वाहतूक पट्टी ठरणार आहे.
Mumbai to Vadhvan | 300 मीटर उन्नत पुलाची रचना कशी असेल? :
उत्तन–विरार (Uttan Virar Sea Bridge) सागरी सेतूचा शेवट विरारच्या चिखल डोंगरी परिसरात होतो. याच भागाच्या पूर्वेला वडोदरा–मुंबई द्रुतगती मार्ग जातो. तसेच या दोन ठिकाणांना 300 मीटर उन्नत पूलाद्वारे जोडले जाईल. याशिवाय पूल उभारणीची जबाबदारी NHAI कडे असून राज्य आणि केंद्र सरकारदरम्यान प्राथमिक चर्चा पूर्ण आहे.
तसेच या पूलामुळे दोन्ही मार्ग एकत्र जोडले जातील आणि मुंबईपासून वाढवण (Mumbai to Vadhvan) बंदरापर्यंत अखंड 120 किमी वेगवान वाहतूक कॉरिडॉर तयार होणार आहे.
बंदर, उद्योग आणि वाहतूक क्षेत्राला मोठा फायदा :
MMRDA च्या मिळालेल्या माहितीनुसार, हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर सागरकिनारी महामार्ग, 3 सागरी सेतू, द्रुतगती मार्ग आणि विशेष महामार्ग अशी एक समन्वित वाहतूक संरचना तयार होईल. यामुळे मोठ्या बांधकाम खर्चाची बचत होणार असून वाढवण बंदराचा प्रवास अधिक जलद होईल.
लॉजिस्टिक आणि औद्योगिक वाहतूक जलद झाल्याने निर्यात, आयात, व्यापार आणि औद्योगिक क्षेत्रात मोठी क्रांती घडेल. तसेच मुंबईतील ट्रॅफिकवरील दबाव कमी होऊन उत्तरेकडील उपनगरांना नवीन संधी निर्माण होतील.






