Mumbai News | शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात कल्याणमधील (Kalyan) बिर्ला कॉलेजमध्ये शिकणाऱ्या दोन तरुणांमध्ये एका तरुणीवरून वाद झाल्याची घटना घडली आहे. मात्र, हा वाद एवढा विकोपाला गेला की एका तरुणाने चक्क थार गाडी दुसऱ्या तरुणाच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला आहे. सुदैवाने यात कुठलीही मोठी दुर्घटना घडली नाही.
मात्र, या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील कारवाई सुरू केली आहे. सध्या पोलीस (Kalyan Police) प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
एका तरुणीवरून झाला वाद-
पुढे आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, कल्याणच्या (Mumbai) बिर्ला कॉलेजमध्ये (Birla College) हे दोन विद्यार्थी शिकत असून एका मुलीवर या दोघा मुलांचे प्रेम आहे. दरम्यान, “माझी प्रेयसी तू पटवली,” असा वाद त्यांचा सुरू झाला आणि या वादातून सुयश जयेश तिवारी या तरुणाने श्लोक सागर सावंत या तरुणावर कल्याण लोकग्राम परिसरात थार ही कार अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल-
दरम्यान, घटनेतील सुयश जयेश तिवारी आणि श्लोक सागर सावंत हे दोघेही कल्याण (Mumbai) पश्चिमेतील बिर्ला कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. या घटनेबाबत कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही तक्रारदार तक्रार देत नसून जबाब नोंदवून घेतला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली आहे.
किरकोळ वादातून जावयाकडून सासऱ्याची हत्या-
दुसऱ्या एका घटनेत, किरकोळ वादाच्या कारणावरून जावयाने सासऱ्यावर कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केल्याची घटना यवतमाळच्या जवाहर नगर येथे घडली आहे. दिलीप पुरुषोत्तम वाडेकर (55) असे हत्या झालेल्या सासऱ्याचे नाव आहे, तर रचीद्र झिबलकर (29) असे मारेकरी जावयाचे नाव आहे. मारेकरी रचीद्र झिबलकर हा पत्नीसोबत वाद करत तिला नेहमी मारहाण करत होता.
त्यामुळे मृतक दिलीप वाडेकर हे मुलीला घेण्यासाठी जवाहरनगर येथे आले होते. आरोपी रचीद्र झिबलकर याने मृतकासोबत वाद घालत कुऱ्हाडीचे घाव घालून सासऱ्याची हत्या केली. हा रक्तरंजित थरार यवतमाळच्या जवाहरनगर भारी परिसरात 27 जानेवारीच्या रात्रीच्या दरम्यान घडला आहे.






