Rains Alert | महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे चढउतार जाणवत आहेत. काही दिवसांपासून रिमझिम सरींनी वातावरण सुखद केले असले तरी आता पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४८ तासांत मुंबई-ठाण्यासह कोकण पट्ट्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. (Maharashtra Weather Update)
मुंबई-ठाण्यात यलो अलर्ट :
मुंबईत आज (१२ सप्टेंबर) तुलनेने कमी पाऊस पडेल. शहरातील काही भागांत अधूनमधून हलक्या सरी कोसळतील. सकाळी व संध्याकाळी आभाळ दाटून येईल. तापमान २७ ते ३१ अंश सेल्सिअसदरम्यान राहणार असून आर्द्रतेमुळे उकाडा जाणवेल. मात्र उद्यापासून म्हणजेच १३ सप्टेंबरपासून हवामान विभागाने दोन दिवसांसाठी यलो अलर्ट (Rain Yellow Alert) जारी केला आहे.
ठाणे आणि नवी मुंबई परिसरातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. किनारी भागांत समुद्राकडून मंद झुळूक वाहेल. शनिवारीपासून मुसळधार पावसाची शक्यता वाढणार असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
Rains Alert | पालघर व कोकणातील जिल्ह्यांचा अंदाज :
पालघर (Palghar) जिल्ह्यात दिवसभर मध्यम पावसाची शक्यता आहे. किनारपट्टी व ग्रामीण भागांत पावसाची तीव्रता अधूनमधून बदलत राहील. दिवसभर दमट हवामान राहणार असून हलक्या झुळुकींचा अनुभव मिळेल.
दरम्यान, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही पावसाचे चित्र मिश्र राहणार आहे. काही ठिकाणी तुरळक सरी पडतील तर डोंगराळ आणि किनारी भागांत मध्यम पावसाचा अंदाज आहे. तापमान २५ ते ३० अंश सेल्सिअस दरम्यान राहणार असून दमट हवामान कायम राहील. १३ सप्टेंबरपासून कोकणात पावसाचा जोर वाढणार असल्याने मुसळधार स्वरूपाचे हवामान निर्माण होण्याची शक्यता आहे.






