Mumbai Indians Gift l मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) एक सुंदर सामाजिक उपक्रम घेतला आहे. २७ एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या (LSG vs MI) सामन्यात, तब्बल १९,००० मुलांना मोफत लाईव्ह सामना पाहण्याची संधी दिली जाणार आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून २०० विशेष मुलांनाही सामावून घेण्यात आले आहे.
हा खास उपक्रम ‘एज्युकेशन अँड स्पोर्ट्स फॉर ऑल’ (ESA) या प्रकल्पाअंतर्गत राबवला जात आहे, ज्याची सुरुवात नीता अंबानी यांनी २०१० साली केली होती. दरवर्षी आयपीएलच्या एका सामन्यादरम्यान हा उपक्रम आयोजित केला जातो.
मुलांना मिळणार खास अनुभव :
या सामन्यात सहभागी होणाऱ्या मुलांना त्यांच्या आवडत्या क्रिकेट स्टार्सना जवळून पाहण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. वानखेडे स्टेडियमच्या जल्लोषपूर्ण वातावरणात सामन्याचा थरार अनुभवण्याचा आनंद मुलांना पहिल्यांदाच मिळणार आहे. यासाठी रिलायन्स फाउंडेशनने विविध NGO सोबत करार केला आहे.
नीता अंबानी यांनी या उपक्रमाबद्दल भावना व्यक्त करत सांगितले की, “या मुलांमध्ये मोठी क्षमता आहे. आम्ही त्यांना सांगू इच्छितो की तुम्हीही चमत्कार करू शकता.”
Mumbai Indians Gift l एक हृदयस्पर्शी कथा :
नीता अंबानी (Nita Ambani) यांनी यावेळी एका छोट्या मुलीची हृदयस्पर्शी कथा सांगितली. एका लहान मुलीने चार वेळा मिळालेल्या फूड पॅकेट्सपैकी एकही पॅकेट न उघडता स्वतःजवळ ठेवले होते. विचारल्यावर तिने सांगितले की, ती आपल्या भावासाठी ते पॅकेट राखून ठेवत आहे कारण त्याने कधीच केक खाल्ला नव्हता. ही कथा ऐकवताना नीता अंबानी भावुक झाल्या.
२०१० पासून सुरू असलेल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे विविध पार्श्वभूमीतील मुलांना शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात संधी मिळवून देणे. या उपक्रमाद्वारे मुंबई इंडियन्स नव्या पिढीला प्रेरणा देत आहे आणि त्यांना सक्षम बनवत आहे.






