Prakash Mahajan Resign | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे प्रमुख प्रवक्ते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपासून ते पक्षांतर्गत नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर गुरुवारी त्यांनी अधिकृतरीत्या राजीनामा देत पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला.
नाराजीचं कारण काय? :
प्रकाश महाजन यांनी राजीनामा देताना आपली खदखद व्यक्त केली. “गंगेला बोल लावला तेव्हा खरंतर मी थांबायला हवं होतं, पहेलगामच्या वेळी थांबायला हवं होतं. पण मला वाटलं काहीतरी सुधारणा होईल.” (Prakash Mahajan Resign)
त्यांनी स्पष्ट सांगितले की, त्यांना कधीच पदाची किंवा तिकीटाची अपेक्षा नव्हती, फक्त हिंदुत्वाचा विचार जोपासला जावा एवढीच अपेक्षा होती. परंतु अपेक्षा कमी ठेवूनही त्यांना वारंवार उपेक्षा सहन करावी लागली. तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना महत्त्व न दिल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
Prakash Mahajan Resign | अमित ठाकरेबाबतची खंत :
महाजन यांनी आपल्या भाषणात अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्याबाबत विशेष उल्लेख केला. “मी छत्रपती संभाजीनगरच्या सभेत अमितजींना शब्द दिला होता की मी तुमच्यासोबत आणि तुमच्या मुलासोबत काम करेन. पण दुर्दैवाने परिस्थिती अशी आली की दिलेला शब्द मी पाळू शकलो नाही.” त्यांनी याबाबत अमित ठाकरे यांची क्षमा मागितली आणि मनसैनिकांचे मनापासून आभार मानले.
दरम्यान, मनसेला महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर आहेत. अशा वेळी पक्षाचे प्रवक्ते आणि महत्त्वाचे चेहरा असलेले प्रकाश महाजन यांनी पद सोडणे म्हणजे राज ठाकरेंसाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. आता पक्ष त्यांची मनधरणी करतो का, की महाजन पुढे नवा राजकीय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






