Mahayuti | राज्यात महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन होऊन आता तीन महिने उलटले तरीही मंत्र्यांमध्ये आवश्यक असलेला समन्वय दिसून येत नाही. विशेषतः राज्यमंत्र्यांना त्यांचं स्वतंत्र अधिकारप्राप्त स्थान न मिळाल्यामुळे त्यांची नाराजी उफाळून आली आहे. याच पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या आरोग्य सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्यात आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर (Meghana Bordikar) अनुपस्थित राहिल्या, आणि त्यामुळे अधिकारवाटपाच्या मुद्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा तापली आहे.
मंत्र्यांमध्ये वादाची ठिणगी?
आतापर्यंत अनेक राज्यमंत्री कॅबिनेट मंत्र्यांच्या सहकार्याच्या अभावामुळे नाराजी व्यक्त करत आहेत. त्यांच्या मते, मंत्रिपद असूनही त्यांना महत्त्वाच्या निर्णयांपासून दूर ठेवण्यात येत आहे.
काही राज्यमंत्र्यांनी गुप्तपणे हेही स्पष्ट केलं आहे की, कॅबिनेटमधील वरिष्ठ मंत्री त्यांच्यासोबत संवाद साधत नाहीत किंवा अधिकार सोपवत नाहीत, ज्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर मर्यादा येत आहेत. ही नाराजी आता सार्वजनिक पातळीवर येत असल्याने लवकरच हे सर्व नाराज मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Mahayuti | फडणवीसांचा मार्ग इतर मंत्र्यांना नकोसा?
राज्यात सध्या ३८ मंत्र्यांचे महायुती सरकार कार्यरत आहे. यामध्ये भाजपचे १९, शिवसेनेचे ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ मंत्री आहेत. गृह खाते स्वतःकडे ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यातील काही अधिकार शिवसेनेचे राज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्याकडे सोपवले आहेत. योगेश कदम यांनी या अधिकारांचा पुरेपूर उपयोग करून स्वतंत्र भूमिका घेतली आहे. मात्र इतर कॅबिनेट मंत्र्यांनी मात्र आपल्या खात्यातून राज्यमंत्र्यांना कोणतेही ठोस अधिकार दिलेले नाहीत.
अधिकारवाटपाच्या मुद्याव्यतिरिक्त, पालकमंत्रीपदावरूनही भाजप आणि शिवसेनेत वाद निर्माण झाले आहेत. नाशिक, रायगड आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या पदांवरून संघर्षाच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पदावरून हटवण्याची भाजपची मागणीही चर्चेचा विषय ठरली आहे. यामुळे केवळ राज्यमंत्र्यांमध्येच नव्हे तर संपूर्ण महायुती सरकारमध्ये अधिकारावरून सुरु झालेला संघर्ष सरकारसाठी गंभीर डोकेदुखी ठरत आहे.






