Maharashtra Weather Update | महाराष्ट्रात मान्सूनने निरोप घेतला जात असतानाच आता पुन्हा एकदा पावसाचे सावट राज्यावर घोंगावत आहे. हवामान विभागाने १५ ऑक्टोबरपासून मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरडे हवामान असल्याने शेतकरी आणि नागरिकांनी दिलासा घेतला होता, मात्र, पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Today Maharashtra Weather Update)
पावसाच्या पुनरागमनाची चिन्हे :
यावर्षीचा मान्सून हंगाम महाराष्ट्रासाठी अत्यंत आव्हानात्मक ठरला. मे अखेरीपासून सुरू झालेल्या पावसाने जून-जुलैमध्ये मध्यम, तर ऑगस्टमध्ये कहर केला. सप्टेंबर महिन्यात मान्सून कमी होईल अशी अपेक्षा होती, परंतु विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाने पूरसदृश परिस्थिती निर्माण केली. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले, घरात पाणी शिरले, आणि शेतजमिनी वाहून गेल्या. ऑक्टोबरच्या सुरुवातीला नैऋत्य मान्सून परत जाईल, असा अंदाज होता. मात्र, भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अपडेटनुसार, १५ ऑक्टोबरपासून राज्यात पुन्हा विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि पावसाची नवी फेरी येणार आहे.
राज्यात परतीचा मान्सून सुरू झाला असतानाही हवामानात अचानक बदल दिसून येत आहे. हा बदल दक्षिणेकडून येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे होत असल्याचे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे १५ ते १८ ऑक्टोबरदरम्यान राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस आणि गडगडाट होऊ शकतो.
Maharashtra Weather Update | सरकारचा शेतकऱ्यांना इशारा
या संभाव्य पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कापणी केलेले पीक सुरक्षित ठिकाणी ठेवावे आणि जोरदार वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात १५ ते १८ ऑक्टोबरदरम्यान दुपारी गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत विजांचा कडकडाटही होऊ शकतो.
खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरी भागांत पावसाळा संपल्याचे जाहीर झाल्यानंतरही पुन्हा हवामान बदलण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहून आवश्यक ती तयारी ठेवण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. नागरिकांनी सावध राहा, पावसाचा जोर पुन्हा वाढणार राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामान कोरडे होते. त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे संकेत होते. मात्र, आता पुन्हा वाऱ्यांचा वेग, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. १५ ऑक्टोबरपासून येणारा हा पाऊस काही दिवस टिकू शकतो.
त्यामुळे नागरिकांनी हवामान खात्याच्या सुचना पाळाव्यात, तसेच नद्या, ओढे आणि धरणांच्या परिसरात जाणे टाळावे, असा इशारा देण्यात आला आहे. राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने संभाव्य पावसाच्या तयारीला सुरुवात केली आहे. आपत्ती व्यवस्थापन पथके सतर्क ठेवण्यात आली असून, नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. आता सर्वांचे लक्ष १५ ऑक्टोबरकडे लागले असून, पावसाचा हा नवा टप्पा किती प्रभाव दाखवतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.






