Suyash Tilak Accident | ‘का रे दुरावा’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेला मराठी अभिनेता सुयश टिळकच्या (Suyash tilak) गाडीला भीषण अपघात झाला. या अपघाताची माहिती स्वतः सुयशनं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत दिली आहे. अपघात झाल्यानंतर तो पूर्णपणे सुरक्षित असल्याचं त्यानं सांगितलं, मात्र या घटनेनंतर मुंबई गाठण्यासाठी त्याला प्रचंड संघर्ष करावा लागला. सुयशनं सांगितलं की, अपघातानंतर त्याला तब्बल ६-७ तास ट्रकमधून प्रवास करावा लागला. (Suyash Tilak Accident)
घटनेबाबत सुयश म्हणाला की, “वाहन न चालवता केलेला हा माझा सर्वात लांब प्रवास होता. थोडासा अपघात झाला, पण सुदैवाने कुठलीही दुखापत झाली नाही. मात्र गाडीचं इतकं नुकसान झालं की ती बंद पडली. अपघात अशा ठिकाणी झाला जिथे मला कोणतीही मदत मिळत नव्हती.”
तासभर प्रतीक्षा, नंतर महामार्गावरून ६-७ तासांचा प्रवास :
सुयशने सांगितलं की, “घरी जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे गाडी टो करून मुंबईत आणणे. साधारण तासभर वाट पाहिल्यानंतर मदत पोहोचली. टो ड्रायव्हरनं सांगितलं की, आत बसा, गाडीला कधी मदतीची गरज भासली तर. माझी गाडी तर अक्षरशः श्वासही घेऊ शकत नव्हती! मग मी एसी नसलेल्या शांत गाडीत बसलो होतो. ६-७ तास महामार्गावरून ओढत नेलं जात होतं. रस्त्यावरचे लोक आत डोकावत होते, काहीजण हसत होते, तर काही अंदाज बांधत होते की नेमकं काय झालं असेल.”
या प्रवासादरम्यान तो रागावू शकला असता, चिडू शकला असता, पण त्यानं संयम ठेवला. “कधी कधी आयुष्य तुमच्यासमोर जी परिस्थिती आणतं, ती तशीच स्वीकारावी लागते. मी पुस्तक वाचलं, संगीत ऐकलं, थोडा झोपलो आणि या असामान्य प्रवासाचा आनंद घेतला,” असं सुयशनं सांगितलं. (Suyash Tilak Accident)
Suyash Tilak Accident | ‘आयुष्य तुम्हाला खेचत नेतं…’ :
या अनुभवाबाबत सुयश पुढे म्हणाला, “दिवसभराचा अनुभव मी मोबाईलमध्ये टिपला आणि त्याचा मिनी व्लॉग तयार केला आहे. कधी कधी, आयुष्य तुम्हाला खेचत नेतं, तुम्हाला आवडो वा न आवडो. तुम्ही तो प्रवास रागाने घालवू शकता… किंवा खिडकी उघडून, खोल श्वास घेऊन तो प्रवास एन्जॉय करू शकता.”
त्याच्या या पोस्ट आणि व्हिडिओला सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. चाहत्यांनी त्याच्या सुरक्षिततेबद्दल दिलासा व्यक्त केला असून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (Suyash Tilak Accident)






