Maratha Quota Victory | मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला आज अखेर निर्णायक वळण लागलं आहे. मनोज जरांगे पाटलांनी सरकारचा अंतिम मसुदा मान्य केला असून, तासाभरात जीआर काढण्याची तयारी सरकारकडून सुरू आहे. हा जीआर हाती आल्यानंतर गुलाल उधळत मराठा समाज आनंद व्यक्त करणार आहे.
हैद्राबाद गॅझेट लागू – आंदोलनात जल्लोष :
सरकारनं हैद्राबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता दिल्याची घोषणा होताच आझाद मैदानात “एक मराठा, लाख मराठा”च्या घोषणा देत जल्लोष झाला. मनोज जरांगे म्हणाले, “तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो. मागण्या मान्य झाल्या की, सर्व मराठे मुंबई रिकामी करतील. रात्री ९ वाजेपर्यंत आम्ही हा निर्णय पाळू.”
जरांगे (Manoj jarange Patil) यांनी सरकारला मागणी केली की, सातारा, हैद्राबाद गॅझेटियरसाठी वेगळा जीआर आणि उर्वरित मागण्यांसाठी स्वतंत्र जीआर तातडीने काढावा.
Maratha Quota Victory | सातारा गॅझेटसाठी १ महिन्याची मुदत :
सरकारसोबतच्या चर्चेत सातारा संस्थान, पुणे आणि औंध गॅझेटच्या अंमलबजावणीबाबत काही कायदेशीर अडचणी असल्याचं सांगण्यात आलं. त्या तपासून १५ दिवसांत निर्णय प्रक्रियेला वेग देण्यात येईल आणि सातारा गॅझेटसाठी एका महिन्याची मुदत देण्यात आली आहे.
जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं की, महाराष्ट्रातील आंदोलनकर्त्यांवर नोंदवलेले गुन्हे सरकार मागे घेणार आहे. काही गुन्हे आधीच मागे घेतले गेले असून, उर्वरित गुन्ह्यांसाठी कोर्टात प्रक्रिया सुरू आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व गुन्हे मागे घेतले जातील, अशी लेखी हमी सरकारने दिली आहे. हा मुद्दा जीआरमध्येही नमूद होणार आहे.
रात्री ९ पर्यंत मुंबई रिकामी :
मनोज जरांगे (Manoj jarange Patil) यांनी आंदोलकांना संदेश दिला आहे की, सर्व मागण्या जीआरमध्ये नमूद झाल्यानंतर रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई रिकामी केली जाईल. त्यासाठी सगळ्या मराठा बांधवांना शांततेने घरी परतण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.






