Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला थेट इशारा दिला आहे. “कुणबी प्रमाणपत्र वितरित होईपर्यंत कोणतीही नोकर भरती घेऊ नका,” असा इशारा त्यांनी दिला असून, अतिवृष्टीने झालेल्या शेती नुकसानीबाबत सरकारला फक्त 15 दिवसांचा अवधी दिला आहे. या कालावधीत पंचनामे पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. (Manoj Jarange Patil)
राज्यातील अतिवृष्टीमुळे मराठवाडा (Marathwada) आणि इतर भागांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले असले तरी अनेक शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही. अशातच, जरांगे पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील डिकसळ येथे पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढा देण्याची घोषणा केली आहे.
कुणबी प्रमाणपत्र वितरित होईपर्यंत नोकरभरती थांबवा – जरांगे :
जरांगे पाटील म्हणाले, “शेतकरी हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आम्ही शेतकऱ्यांची लेकरं आहोत. सरकारने पंचनामे पूर्ण करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी 15 दिवसांचा अवधी दिला आहे. पण जोपर्यंत कुणबी प्रमाणपत्र वाटप पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोणतीही नोकर भरती काढू नका.”
राज्य सरकारने 2 सप्टेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करून हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात शासन निर्णय काढला आहे. यामुळे मराठवाड्यातील कुणबी समाजाला ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मार्ग खुला झाला आहे. मात्र, प्रत्यक्ष प्रमाणपत्र वाटप सुरू होईपर्यंत जनतेचा संताप वाढत आहे.
Manoj Jarange Patil | “दिवाळीनंतर शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक आंदोलन” :
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सांगितले की, “दिवाळीनंतर राज्यभर शेतकरी बैठका घेण्यात येतील आणि गेल्या 100 वर्षांत झालं नाही असं ऐतिहासिक आंदोलन उभं करण्यात येईल.” त्यांनी पुढे सांगितले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत चांगला निर्णय घेतला, पण त्यांनी दिलेला शब्द पाळावा, ही आमची विनंती आहे.”
त्याचबरोबर त्यांनी स्पष्ट केलं की, “नुसते भाषण करून, चिखलात फिरून शेतकऱ्यांच्या समस्या सुटणार नाहीत. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, पीकांना हमीभाव आणि शंभर टक्के नुकसान भरपाई मिळवायची असेल, तर ताकदीचं आंदोलन करावं लागेल.” त्यांनी पुढे भावनिक शब्दांत म्हटलं, “शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढताना मुंडक्यावर पाय द्यावा लागला तरी चालेल.”






