Manoj Jarange Patil | ओबीसींच्या महाएल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर जोरदार टीका करताना त्यांचा ‘दरिंदे पाटील’ असा उल्लेख केला. या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून, आता जरांगे पाटील यांनीही भुजबळांना तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
“भुजबळांची अक्कल दाढ पडलीय…” :
ओबीसी समाजाच्या एल्गार सभेनंतर पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “हे बीडमध्ये येऊन दहशत निर्माण करीत आहेत. आता मराठ्यांना आपली ताकद दाखवावी लागणार आहे. आम्ही कोणाच्याही दबावाला घाबरत नाही. मराठ्यांनी आपल्या लेकरांचं भवितव्य वाचवण्यासाठी तोडीस तोड उत्तर द्यायलाच हवं.”
भुजबळ यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना जरांगे म्हणाले, “भुजबळ काहीही बरळत आहेत, त्यांची अक्कल दाढ पडलीय. घुरट सगळीकडे वास दरवळत हिंडतोय तसं त्यांचं झालं आहे. स्वतःच्या चक्रव्यूहात ओबीसी नेत्यांना अडकवून त्याचा देव्हारा ते करीत आहेत.”
Manoj Jarange Patil | “आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार” :
जरांगे पाटील पुढे म्हणाले, “तुम्ही कितीही दडपण आणा, पण आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार. बीड जिल्ह्यातूनच मराठे दिशा दाखवतील. जातीय दंगली घडवून आणण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही.”
“तुझा रक्ताळलेला चष्मा नको…” :
दरम्यान, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना ‘परळीचा चष्मावाला’ असा उल्लेख करत आपला चष्मा देण्याची तयारी दर्शवली होती.
त्यावर प्रत्युत्तर देताना जरांगे म्हणाले, “तुझा चष्मा कोणी मागितला नाही. तो तुलाच ठेव! तुझ्या चष्म्याने काय केलंय हे लोकांनी पाहिलं आहे. तुझा रक्ताळलेला चष्मा नको. बीडचे मराठे एवढे कच्चे नाहीत, हे लक्षात ठेवा,” असा इशारा त्यांनी दिला.






