Mahayuti | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. जळगाव जिल्ह्यात (Jalgaon District) हा वाद विकोपाला गेला असून, शिवसेना शिंदे गट आणि भाजपने (BJP) एकमेकांविरोद्धात स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर युतीत मोठी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
जळगावात युतीला सुरुंग; शिंदे गट-भाजप आमनेसामने :
जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील दोन प्रमुख घटक पक्षांनी वेगवेगळी भूमिका घेतली आहे. शिवसेना शिंदे गटाने (Shiv Sena Shinde Group) जिल्ह्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा सर्वप्रथम केली. नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी ही तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिंदे गटाच्या या भूमिकेनंतर, भाजपनेही (BJP) आक्रमक पवित्रा घेत तातडीची बैठक बोलावली. या बैठकीनंतर, भाजपनेही जिल्ह्यात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच लढणार असल्याचे जाहीर केले. महायुतीच्या या दोन्ही मोठ्या पक्षांनी केलेल्या अधिकृत घोषणांमुळे जळगाव जिल्ह्यात महायुती फुटल्याचे मानले जात आहे.
Mahayuti | आमदार किशोर पाटलांचे ‘वेट अँड वॉच’ चॅलेंज :
या सर्व घडामोडींवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांनी एक खुले आव्हानच दिले आहे. त्यांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेण्यास सांगत, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महायुतीचे घटक पक्ष स्वबळावरच लढतील, असा मोठा दावा केला आहे. “माझ्या या निर्णयाशी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसही (NCP) सहमत होतील. खूप कमी ठिकाणी महायुती दिसेल,” असे भाकीत त्यांनी केले आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरून झालेली धुसफूस आता स्थानिक पातळीवरही सुरू झाली आहे, यावर किशोर पाटील यांच्या वक्तव्याने शिक्कामोर्तब केले आहे. विशेष म्हणजे, पाटील यांनी यापूर्वीच आपल्या पाचोरा-भडगाव (Pachora-Bhadgaon) मतदारसंघात स्वबळाची घोषणा केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपचे आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांनीही तातडीने बैठक घेत त्याच मतदारसंघात भाजप स्वबळावर लढेल, असे जाहीर केले होते.






