शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा! विदर्भ-मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा

On: April 12, 2025 12:39 PM
Weather Update
---Advertisement---

Maharashtra Weather Update | राज्यात उन्हाचे चटके वाढत असून तापमानाने ४० अंशांचा टप्पा पार केला आहे. नंदुरबार येथे तब्बल ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दुसरीकडे, विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या हवामानाचा अनुभव येत आहे. (Maharashtra Weather Update)

हवामान खात्याने काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला असून विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि हलक्या सरींची शक्यता वर्तवली आहे. पावसाच्या या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे, कारण काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

या जिल्ह्यांना यलो अलर्ट 

कोल्हापूर, नागपूर, गोंदिया, वर्धा, परभणी, बीड, सातारा, अमरावती, हिंगोली, भंडारा, गडचिरोली, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने या भागांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.

तर नांदेड, लातूर, पुणे, सोलापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नंदुरबार, जळगाव आणि धुळे या भागांमध्ये हवामान कोरडेच राहणार आहे. मुंबईत ३५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे.

बुलढाणा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी

बुलढाणा जिल्ह्यात उष्माघातामुळे ११ वर्षीय संस्कार सोनटक्के या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तो शेगाव येथील संत गजानन महाराज ज्ञानपीठमध्ये शिकत होता. अधिक उन्हामुळे त्याची प्रकृती बिघडली आणि उपचारासाठी अकोल्याला नेत असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ही घटना उष्णतेची तीव्रता आणि वाढती धोकादायक स्थिती अधोरेखित करते. यामुळे नागरिकांनी जास्त उष्णतेच्या काळात काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शाळकरी मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने सावध राहणे गरजेचे आहे.

English Title: Maharashtra Weather Update Thunderstorm Alert in Vidarbha Marathwada 

 

Join WhatsApp Group

Join Now