Weather Update | महाराष्ट्रात परतीच्या पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. गेल्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची नोंद झाली. रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे तब्बल २७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर भागातही जोरदार पाऊस झाला. पुणे हवामान केंद्राने राज्यातील अनेक भागांसाठी अलर्ट जारी केला असून, पुढील दोन दिवस नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, सध्या महाराष्ट्रावर चक्राकार वारे वाहत असल्याने पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा म्हणजेच मान्सूनचा परतीचा प्रवास राजस्थानातून सुरू झाला असून त्याचा परिणाम महाराष्ट्रावर दिसून येत आहे. त्यामुळे पुढील ४८ तास राज्यभरात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Update)
कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट? :
हवामान विभागाने रायगड, पुणे घाटमाथा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange alert) दिला आहे. या भागांत अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः घाटमाथ्यावरील भागांमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलनाचा धोका वाढू शकतो. प्रशासनाने नागरिकांना आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असा सल्ला दिला आहे.
याशिवाय, या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटही होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेती, प्रवास आणि दैनंदिन कामकाजावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Update)
Weather Update | यलो अलर्ट असलेले जिल्हे :
मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, नाशिक घाटमाथा, जळगाव, अहिल्यानगर, सातारा घाटमाथा, बीड, बुलढाणा, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांना यलो (Rain Yellow Alert) अलर्ट देण्यात आला आहे. या भागातही जोरदार पावसाची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह वादळी वारा वाहण्याचा अंदाज आहे.
तसेच, नंदूरबार, धुळे, पुणे, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी खुल्या जागेत जाणे टाळावे आणि सुरक्षित ठिकाणी थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे.






