Maharashtra Weather | श्रावणाच्या शेवटच्या टप्प्यात पावसाचा जोर कमी झाल्याने राज्यातील शेतकरी आणि नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, गणेशोत्सवाच्या तोंडावर पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. आज, 26 ऑगस्ट रोजी हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः कोल्हापूर, सातारा आणि पुणे घाटमाथा परिसरात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात आज मेघगर्जनेसह सरींची शक्यता आहे. मात्र, पुणे जिल्ह्याच्या उर्वरित भागासाठी विशेष पावसाचा इशारा नाही. घाटमाथ्यावरील भागात पुढील चार दिवस पावसाची तीव्रता कायम राहणार असून, या भागातील नागरिक आणि पर्यटकांनी काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (Maharashtra Weather)
सातारा-कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता :
मागील काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे सातारा जिल्ह्यातील सर्व प्रमुख धरणे भरली असून, पाणीसाठा वाढला आहे. आता पुन्हा एकदा साताऱ्यातील डोंगराळ भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्याच्या इतर भागांत हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात आज दिवसभर पावसाची शक्यता असून, घाटमाथ्यावरील भागात पावसाचा जोर अधिक राहील. हवामान विभागाने या भागासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी जिल्ह्याच्या बहुतांश भागांत कोसळणार आहेत. नागरिकांनी नदीकाठच्या भागांत आणि निचांकी प्रदेशात विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Maharashtra Weather | सोलापूर-सांगलीत हलक्या सरींचा अंदाज :
दरम्यान, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा नसला तरी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत पुढील काही दिवसांत पावसाची हजेरी राहणार आहे. (Maharashtra Weather Update )
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजन करावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. विशेषतः मंडळांनी मंडपांची उभारणी, विद्युत जोडणी आणि वाहतुकीचे नियोजन करताना हवामानातील बदल विचारात घ्यावा, अशी सूचना करण्यात आली आहे.






