Agro Logistics Hubs | महाराष्ट्रामध्ये शेतमालावर आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी आणि निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी चार नवीन कृषी लॉजिस्टिक हब (Agro Logistic Hub) उभारले जाणार आहेत. राज्य शासनाच्या या उपक्रमाचा उद्देश कृषी क्षेत्राला अधिक बळकटी देणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा आहे. हे हब पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण या विभागांमध्ये उभारले जातील आणि यासाठी समृद्धी महामार्गाजवळील जागा निवडण्यात आली आहे. (Agro Logistics Hubs)
समृद्धी महामार्गाचा उपयोग
नागपूर ते मुंबई जलद रस्ता वाहतुकीसाठी समृद्धी महामार्ग महत्त्वाचा ठरत आहे. नाशवंत शेतमालाची वाहतूक कमी वेळेत आणि सुरक्षितपणे करण्यासाठी या महामार्गाचा उपयोग केला जाईल. त्यामुळे, शेतकऱ्यांचा माल लवकरात लवकर बाजारपेठेत पोहोचेल.
या महामार्गाजवळ, नागपूर विभागात नागपूर (Nagpur), मराठवाड्यात संभाजीनगर (Sambhajinagar), पुणे विभागात तळेगाव (Talegaon) आणि कोकण विभागात भिवंडी (Bhiwandi) येथे हे कृषी लॉजिस्टिक हब उभारले जातील. आशियाई विकास बँकेच्या मदतीने हे प्रकल्प उभारले जाणार आहेत. पणन विभागाच्या मॅग्नेट प्रकल्पांतर्गत या हबची उभारणी करण्याबाबत विचार चालू आहे. पणनमंत्री जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांनी तळेगाव येथील १०० एकर जागेची पाहणी केली आहे. हे हब तळेगाव उद्यानविद्या तंत्रज्ञान केंद्राजवळ असून, फुलांच्या निर्यातीसाठी उपयोगी ठरणार आहे. (Agro Logistics Hubs)
आर्थिक वाढीसाठी प्रयत्न
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, राज्य शासन विविध उपाययोजना करत आहे. याचाच एक भाग म्हणून, नवी मुंबई आणि पुण्यात आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक हब, तर वर्धा आणि नागपूर येथे राष्ट्रीय लॉजिस्टिक हब उभारले जाणार आहेत. तसेच, ५ ठिकाणी प्रादेशिक आणि २५ जिल्ह्यांमध्ये जिल्हा लॉजिस्टिक हब सुरू करण्याचे नियोजन आहे. यासोबतच, शेतीमालावर प्रक्रिया करून त्याची निर्यात वाढवण्यासाठी, पणन विभागाने पुढाकार घेऊन राज्यात चार ठिकाणी ॲग्रो लॉजिस्टिक हब उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रत्येक हबसाठी १०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. यामध्ये गोदाम, शीतगृह, प्रतवारी युनिट, ट्रक टर्मिनल, पेट्रोल पंप आणि इतर आवश्यक सुविधांचा समावेश असेल. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजीनगर जिल्ह्यातील जांबरगाव येथील ॲग्रो लॉजिस्टिक हबचे उद्घाटन ४५ दिवसांत करण्याचे नियोजन आहे. (Agro Logistics Hubs)
Title : Maharashtra to Build 4 Agro Logistics Hubs






