Maharashtra Railway News | नवीन वर्षाच्या स्वागताआधीच महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. २०२५ हे वर्ष संपत असतानाच मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील नागरिकांना मोठी सुविधा मिळाली असून, आजपासून दोन महत्त्वाची रेल्वे स्थानके सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहेत. या निर्णयामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून दररोज लाखो प्रवासी लोकल रेल्वेवर अवलंबून असतात. त्यामुळे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा करण्याची मागणी होत होती. त्याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.
बेलापूर-नेरूळ-उरण मार्गावर मोठा दिलासा :
बेलापूर-नेरूळ-उरण रेल्वे मार्गावरील तारघर आणि गव्हाण ही दोन नवी स्थानके १५ डिसेंबर २०२५ पासून प्रवाशांच्या सेवेत सुरू करण्यात आली आहेत. या सोबतच या मार्गावर पाच अतिरिक्त लोकल फेऱ्याही सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील एकूण लोकल फेऱ्यांची संख्या आता ४० वरून ५० इतकी झाली आहे. (Maharashtra Railway News)
गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावरील लोकल फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून सातत्याने केली जात होती. प्रवाशांच्या तक्रारी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्या होत्या, ज्यामुळे या मार्गावर अधिक लोकल सुरू करण्याचा मुद्दा गंभीरपणे घेतला गेला.
Maharashtra Railway News | मुख्यमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी स्वतः केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे या मार्गावर लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त पाच लोकल फेऱ्या आणि दोन नवीन स्थानकांना मंजुरी दिली. (Maharashtra Railway News)
विशेष म्हणजे, तारघर रेल्वे स्थानक (Talghar Railway Station) नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अत्यंत जवळ असून, या स्थानकाच्या उभारणीसाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या स्थानकामुळे भविष्यात विमानतळ प्रवाशांना मोठा फायदा होणार असून, नवी मुंबईतील वाहतूक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






