Maharashtra Rain Update | राज्यातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून पावसाने दिलासा दिला असला तरी हा दिलासा फार काळ टिकणार नाही. भारतीय हवामान विभागाने पुढील आठवड्यातील हवामानाचा अंदाज जाहीर करताना १६ ते १८ सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्रावर जोरदार पावसाचे संकट येऊ शकते, असा मोठा इशारा दिला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे.
परतीच्या मॉन्सूनची धडक :
यंदाचा मॉन्सून राज्यात लवकर दाखल झाला आणि पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, तर अनेक जिल्ह्यांतील धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी आता परतीचा मॉन्सून मोठ्या प्रमाणात धडकणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. कोकण, मराठवाडा आणि विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. (Maharashtra Rain Update)
भारतीय हवामान विभागानुसार, या काळात केवळ पावसाचाच नाही तर विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल. १६ ते १८ सप्टेंबरदरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये हवामान ढगाळ राहील आणि मुसळधार पाऊस कोसळेल. यामुळे नद्या-नाल्यांचा पाणीपातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे.
Maharashtra Rain Update | कोणत्या भागांना सर्वाधिक फटका? :
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर, लातूर, परभणी, सोलापूर, सांगली, सातारा, जळगाव, नाशिक, पुणे, यवतमाळ, नागपूर, अकोला, अमरावती आणि कोल्हापूर या भागात जोरदार पाऊस होऊ शकतो. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, नांदेड जिल्हा सर्वाधिक प्रभावित ठरला होता. आता पुन्हा एकदा या भागांमध्ये पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. (Maharashtra Rain Update News)
मागील पावसामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी परतीच्या पावसाच्या अगोदर शेतीची कामे उरकून घ्यावीत, असे आवाहन प्रशासन आणि हवामान विभागाने केले आहे. पिके, जनावरं आणि शेतमाल सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.






