Maharashtra Weather Update | फेब्रुवारी अखेरच्या टप्प्यात असतानाही राज्यात थंडीचा प्रभाव फारसा जाणवला नाही. उलट हिवाळ्याने लवकरच माघार घेतल्याचे चित्र दिसत असून 21 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात उष्ण आणि कोरडे वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण ते विदर्भपर्यंत (Vidarbha Marathwada Heat) तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
21 फेब्रुवारीसाठी राज्यभर उष्णतेचा इशारा :
नववर्षाच्या सुरुवातीपासूनच थंडीचा प्रभाव कमी होत गेला आणि आता उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. 21 फेब्रुवारी रोजी बहुतेक ठिकाणी आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असून दिवसाच्या वेळेत उन्हाची तीव्रता वाढेल. बहुतांश भागात वातावरण कोरडे राहील. तापमानात मोठी उसळी अपेक्षित नसली तरी काही ठिकाणी कमाल तापमानात सुमारे 1 अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होऊ शकते.
हा अंदाज केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून पुढील काही दिवसांतही अशीच स्थिती कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मार्चच्या सुरुवातीपर्यंत उष्णतेत टप्प्याटप्प्याने वाढ होईल, असे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, कामानिमित्त बाहेर पडणारे नागरिक तसेच सर्वसामान्यांसाठी हा अंदाज महत्त्वाचा मानला जात आहे.
Maharashtra Weather Update | विभागनिहाय तापमानाचा तपशील :
कोकण (Konkan Mumbai Weather) आणि मुंबई परिसरात उष्णतेसोबत दमटपणाही जाणवेल. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि किनारपट्टी भागात कमाल तापमान 32 ते 34 अंश सेल्सिअसदरम्यान राहील, तर किमान तापमान 22 ते 24 अंशांदरम्यान राहण्याचा अंदाज आहे. आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवू शकतो.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे (Pune), सांगली (sangli), कोल्हापूर (Kolhapur) आणि सातारा (Satara) येथे सकाळच्या सुमारास हलका गारवा जाणवेल; मात्र दुपारी तापमान 34 ते 36 अंशांपर्यंत वाढेल. किमान तापमान 17 ते 19 अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भातील छत्रपती संभाजीनगर, लातूर, परभणी, नांदेड तसेच नागपूर, अमरावती आणि अकोला येथे उष्णतेची तीव्रता अधिक असेल. (Maharashtra Weather Update)
या भागात कमाल तापमान 35 ते 37 अंशांपर्यंत जाऊ शकते, तर किमान तापमान 19 ते 22 अंशांच्या आसपास राहील. ढगांचा अभाव आणि कोरडे वातावरण यामुळे सूर्यप्रकाश अधिक तीव्र भासेल. दुपारच्या वेळेत कडक ऊन आणि काही ठिकाणी उष्ण वाऱ्याच्या झुळुका जाणवण्याची शक्यता आहे. नागरिकांनी दुपारी बाहेर पडताना काळजी घ्यावी, पुरेसे पाणी प्यावे आणि उष्णतेपासून बचावाचे उपाय करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.






