Maharashtra Farmers | महाराष्ट्रात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने तब्बल ३० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे जगणे उद्ध्वस्त केले आहे. या दोन महिन्यांच्या अतिवृष्टीमुळे १७ लाख ८५ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाले असून उभे पीक, पशुधन आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कष्टाची कमाई पाण्याखाली गेली आहे. (Maharashtra Farmers)
विजय वडेट्टीवर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी :
या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना पत्र लिहून राज्यात तातडीने “ओला दुष्काळ” जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना उभ्या पिकांच्या नुकसानीमुळे आत्महत्येच्या मार्गावर जावे लागत आहे. त्यामुळे केवळ पंचनामे आणि कागदी घोडे नाचवून वेळ घालवण्याऐवजी प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत तातडीने जाहीर करावी.
वडेट्टीवर यांनी पत्रात स्पष्ट केले की, विशेषतः चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, बीड, हिंगोली, लातूर आणि सोलापूर या जिल्ह्यांतील शेतकरी अतिवृष्टीमुळे उध्वस्त झाले आहेत. खरीप हंगाम पूर्णतः कोलमडला असून, वेळेवर मदत न मिळाल्यास आगामी रब्बी हंगामही धोक्यात येईल.
Maharashtra Farmers | सरकारवर टीका आणि ठोस मागण्या :
१६ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा होती, मात्र ठोस निर्णय न आल्याने शेतकऱ्यांची निराशा वाढली आहे. त्यामुळे वडेट्टीवर यांनी काही ठोस मागण्या मांडल्या आहेत :
– शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी
– पीकविमा कंपन्यांवर दबाव आणून विमा दावे त्वरित द्यावेत
– बँकांची वसुली कारवाई थांबवावी, वीज बिल आणि कर्ज थकबाकीवर स्थगिती द्यावी
– अतिरिक्त बियाणे आणि खतांचा साठा उपलब्ध करून द्यावा
– आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना त्वरित मदत द्यावी
– आत्महत्या वाढवणारे संकट
गेल्या ८ महिन्यांत तब्बल ११८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, ही बाब परिस्थितीची गंभीरता दर्शवते. शेतकरी हा अन्नदाता असून त्याला वेळेवर मदत मिळाली नाही तर राज्याच्या शेतीव्यवस्थेलाच मोठं संकट ओढवेल, असा इशाराही वडेट्टीवर यांनी दिला आहे.






