Maharashtra Budget 2025 l महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास लांबणार नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. कृषी क्षेत्रातील बदलांपासून मोफत वीज योजनेपर्यंत, बळीराजाला मोठा दिलासा देणाऱ्या या घोषणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कृषी क्षेत्रासाठी एआयचा वापर आणि 50 हजार शेतकऱ्यांसाठी प्रकल्प :
शेतकरी हा आपल्या जीवनाचा मूलाधार असल्याचे सांगत कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत पिकांचे नियोजन, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादन वाढवणे आणि शेतीमालासाठी बाजारपेठ उपलब्ध करणे यासाठी एआयचा उपयोग केला जाणार आहे. याचा पहिला टप्पा 50 हजार शेतकऱ्यांसाठी प्रायोगिक तत्वावर सुरू केला जाईल.
राज्यातील सिंचन व्यवस्था सुधारण्यासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. तसेच अपूर्ण सिंचन प्रकल्प आणि कालव्यांच्या दुरुस्तीसाठी 5000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत कालवे वितरण प्रणालीसाठी 5000 कोटी रुपयांचे नाबार्ड अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे.
Maharashtra Budget 2025 l राज्यात नवे गृहनिर्माण धोरण आणि मोठ्या योजना :
राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री मोफत बळीराजा वीज योजना. या योजनेत 7978 कोटी रुपयांची सवलत देण्यात येणार आहे, ज्यामुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
राज्य सरकारने नवे गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्याचे सांगितले आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, पीएम जनमन, रमाई आवास, शबरी आवास, पारधी आवास, यशवंतराव चव्हाण वसाहत आणि धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना यांचा समावेश आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे.






