Shirdi Sai Baba Temple | देशभरात एलपीजी गॅसच्या संभाव्य टंचाईची चर्चा सुरू असताना त्याचा परिणाम मोठ्या धार्मिक स्थळांवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री साईबाबा संस्थान मंदिर येथेही या परिस्थितीचा परिणाम दिसू शकतो, अशी माहिती समोर आली आहे. (Shirdi Sai Baba Temple News)
शिर्डीतील प्रसादालयात दररोज हजारो भाविकांसाठी भोजन आणि प्रसाद तयार केला जातो. मात्र गॅस पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यास या कामकाजावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे साईभक्तांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी मानली जात आहे.
दररोज हजारो भाविकांसाठी अन्नाची तयारी :
श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट मार्फत चालविण्यात येणाऱ्या प्रसादालयात दररोज मोठ्या प्रमाणावर अन्न तयार केले जाते. येथे साधारणपणे दररोज 35 ते 40 हजार भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था केली जाते. याशिवाय दररोज सुमारे सात हजार नाष्ट्याची पाकिटे वितरित केली जातात.
भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येणारी बुंदी तसेच विक्रीसाठी तयार केले जाणारे लाडूही मोठ्या प्रमाणावर बनविले जातात. या सर्व प्रक्रियेसाठी एलपीजी गॅसचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. प्रसादालयात दररोज जवळपास दीड टन एलपीजी गॅसचा वापर होत असल्याची माहिती समोर आली आहे. (Shirdi Sai Baba Temple News)
विशेष म्हणजे या गॅसपैकी मोठा हिस्सा लाडू आणि बुंदी तयार करण्यासाठी खर्च होतो. त्यामुळे गॅस पुरवठा खंडित झाल्यास सर्वप्रथम या प्रसादाच्या निर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Shirdi Sai Baba Temple | 15 दिवसांचा गॅस साठा उपलब्ध :
दरम्यान प्रसादालयातील अन्न तयार करण्यासाठी 2009 साली सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यात आली होती. या प्रणालीमुळे दररोज सुमारे 200 किलो एलपीजी गॅसची बचत होते. या सौर यंत्रणेच्या मदतीने दररोज सुमारे पाच टन भात आणि डाळ शिजवली जाते. त्यामुळे गॅसवरील अवलंबित्व काही प्रमाणात कमी झाले आहे.
संस्थानने गॅस साठवण्यासाठी 10 टन क्षमतेचे दोन स्टोरेज टँक उभारले आहेत. या टँकमध्ये सुमारे 20 हजार किलो गॅस साठवता येतो आणि हा साठा साधारण 15 दिवस पुरतो. सध्या उपलब्ध साठा लक्षात घेता संस्थानने अतिरिक्त गॅस टँकरही मागवला असून पुरेसा साठा राखून ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दरम्यान येत्या काही दिवसांत राम नवमी उत्सव असल्यामुळे शिर्डीत मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. जर गॅस टंचाईची परिस्थिती गंभीर झाली तर प्रसादासाठी तयार होणारे लाडू आणि बुंदी तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गॅस पुरवठा सुरळीत राहणे प्रसादालयाच्या कामकाजासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.






