Laxman Hake | महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला असून मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे ओबीसी समाजामध्ये तीव्र असंतोष दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake )यांनी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण (OBC Reservation) मिळण्यास कडाडून विरोध दर्शवला होता. मात्र, आता ते मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून त्यांच्या एका फेसबुक पोस्टनंतर राज्याच्या राजकारणात चांगलाच खळबळजनक माहोल निर्माण झाला आहे.
हाके यांनी स्पष्टपणे लिहिलं आहे की, “मी प्रामाणिकपणे ओबीसी समाजासाठी लढलो, भटके-धनगर समाजाला जोडत गेलो, लाखो माणसं एकत्र केली. परंतु त्याचसोबत शत्रूही निर्माण झाले, हल्ले सहन केले. आता मात्र सहन होत नाही.” या शब्दांत त्यांनी आंदोलनातून माघार घेण्याचे संकेत दिले आहेत.
ओबीसी मेळाव्यानंतर मोठा निर्णय :
लक्ष्मण हाके यांनी जाहीर केलं आहे की, २७ सप्टेंबरनंतर दैत्यानांदूर ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर येथे होणाऱ्या ओबीसी मेळाव्यानंतर ते आपली भूमिका स्पष्ट करतील. आंदोलन सुरू ठेवायचं की त्यातून बाहेर पडायचं, याबाबतचा अंतिम निर्णय हाके घेणार असल्याचे त्यांनी सूचित केले आहे.
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये समर्थकांना आभार मानत लिहिले आहे की, “मी बॅनर लावू शकलो नाही, मोठे स्टेज तयार करू शकलो नाही, पण तुम्ही माझ्या पाठीशी ताकदीने उभे राहिलात. आता आंदोलनात असेन किंवा नसेन, तरी तुमच्या पाठिंब्याबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे.”
मराठा-ओबीसी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर घडामोडी :
मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) णि लक्ष्मण हाके (Laxman Hake )यांच्यात यापूर्वी अनेकदा आमनेसामने संघर्ष झाला होता. दोघांनीही एकमेकांवर तीव्र टीका केली होती. अशा स्थितीत हाके आंदोलनातून बाहेर पडल्यास ओबीसींच्या चळवळीला मोठा धक्का बसू शकतो.
राज्यातील सध्याच्या राजकीय समीकरणात हा निर्णय निर्णायक ठरू शकतो. ओबीसींच्या आंदोलनाची दिशा आणि मराठा आरक्षणाचा पुढील संघर्ष हाके यांच्या निर्णयावर अवलंबून राहणार आहे.






