Kunbi Certificate | मराठा आरक्षणासाठी झालेल्या संघर्षानंतर आजचा दिवस मराठा समाजासाठी भावनिक आणि ऐतिहासिक ठरला आहे. अनेकांनी प्राणांची आहुती दिलेल्या या आंदोलनानंतर अखेर कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू झाले आहे. बीड आणि धाराशिव (Dharashiv) येथे शेकडो मराठा बांधवांना प्रमाणपत्रे देण्यात आली असून, अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. (Kunbi Certificate)
बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून वाटप :
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या औचित्याने बीड येथे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते पाच मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. २ सप्टेंबर २०२५ रोजी सरकारने काढलेल्या जीआरनंतर ही प्रत्यक्षातली पहिली अंमलबजावणी मानली जात आहे. हैदराबाद गॅझेटमधील नोंदींवर आधारित प्रमाणपत्रांमध्ये ‘कुणबी’ असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.
धाराशिवमध्येही पहिल्यांदाच कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) वाटप झाले. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते अभिषेक, प्रगती, पूजा आणि गणेश व्यंकटेश मुंडे या चौघांना प्रमाणपत्रे मिळाली. तर हिंगोलीमध्ये पालकमंत्री नरहरि झिरवळ यांच्या हस्ते तब्बल ५० मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र वाटण्यात आली.
जरांगे पाटलांची भूमिका :
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी यावर भाष्य करताना म्हटले, “मराठवाड्याला मुक्ती मिळाली, पण मराठ्यांना अजूनही खरी मुक्ती मिळणे आवश्यक आहे.” त्यांनी सरकारने दिलेल्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याची मागणी केली. “८४ च्या जीआरचा आधार कसा घेतला, हे स्पष्ट झाले पाहिजे. जर मराठ्यांचे आरक्षण काढणार असाल तर तुमचे आरक्षण कोणत्या पद्धतीने दिले?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
जरांगे पाटील यांनी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले मोठे नुकसान आणि जनावरांचे जीवितहानी याकडेही लक्ष वेधले. सरकारने सर्वांना सरसकट मदत करावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच, “जर आरक्षणाच्या प्रश्नावर काही मागे–पुढे झाले, तर दसऱ्यानंतर आंदोलन वेगळ्या पद्धतीने होईल,” असा इशाराही त्यांनी दिला.






