Dhananjay Munde | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासमोरील अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. करूणा मुंडे (Karuna Munde) यांनी त्यांच्यावर अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांनी आपल्या बहिणीवर बलात्कार केल्याचा दावा करूणा मुंडे यांनी केला असून, या संदर्भातील पुरावे आपण मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याकडे घेऊन गेलो होतो, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे.
करूणा मुंडेंचा गौप्यस्फोट :
करूणा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना भेटल्या होत्या. “मी माझ्याकडे असलेल्या पुराव्यांविषयी त्यांना माहिती दिली,” असे त्या म्हणाल्या. त्यांच्या दाव्यानुसार, जरांगे पाटलांनी त्यांना समजावून सांगितले. “अजून धनंजय मुंडे यांचे काहीच बाहेर काढलेले नाही, जर सर्व बाहेर काढले तर त्यांचे महाराष्ट्रात राहणे मुश्किल होईल. स्वतःच्या समाजाचे लोक त्यांना चपलेने मारतील,” असे जरांगे पाटील म्हटल्याचा दावा करूणा मुंडे यांनी केला.
त्यांनी पुढे आरोप केला की, “माझ्या बहिणीवर बलात्कार झाला, माझ्या आईने आत्महत्या केली, त्यासंबंधीची सुसाईड नोट आणि इतर पुरावे माझ्याकडे आहेत.” धनंजय मुंडे यांनी ‘गुंडा गँग’ पाळली होती, असा आरोपही त्यांनी केला. “माझे धनंजय मुंडेंना चॅलेंज आहे, मी अंगावर येते, मला शिंगावर घे. तुला जीआर कळतो, पण शपथपत्र कळतं का?” असा थेट सवालही त्यांनी मुंडेंना विचारला आहे.
२०२१ मधील जुने प्रकरण पुन्हा चर्चेत :
हे प्रकरण आता पुन्हा चर्चेत आले असले तरी, यापूर्वी २०२१ मध्ये करूणा मुंडे यांची बहीण रेणू शर्मा (Renu Sharma) यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. त्यावेळी रेणू शर्मा यांनी म्हटले होते की, त्या धनंजय मुंडे यांना १९९६ पासून ओळखत होत्या आणि २००६ सालापासून मुंडे यांनी त्यांच्यावर वारंवार बलात्कार केला.
२००६ साली आपली बहीण (करूणा मुंडे) बाळंतपणासाठी इंदूरला (Indore) गेली होती, तेव्हा घरात कोणी नसल्याचा फायदा घेत धनंजय मुंडे घरी आले आणि त्यांनी बलात्कार केला, असा गंभीर आरोप रेणू शर्मा यांनी केला होता. त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रारही दाखल केली होती, मात्र काही दिवसांनी त्यांनी ती तक्रार मागे घेतली होती. आता करूणा मुंडेंच्या नव्या विधानामुळे हे जुने प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून, त्या जरांगे पाटलांच्या मदतीने हा मुद्दा पुन्हा उपस्थित करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






