Jalgaon Crime News | जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून समाजमन सुन्न करणारी आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. मोराड गावात अवघ्या तीन दिवसांच्या चिमुकलीची तिच्याच पित्याने निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चौथी मुलगी झाल्याच्या रागातून बापानेच पोटच्या लेकीचा जीव घेतल्याचे सखोल तपासाअंती स्पष्ट झाले असून, या घटनेने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही घटना 14 नोव्हेंबर रोजी घडली होती, मात्र तब्बल दीड महिन्यानंतर सत्य समोर आले आहे.
या प्रकरणात आरोपी कृष्णा लालचंद राठोड याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आली आहे. सुरुवातीला कुटुंबीयांकडून या मृत्यूला अपघाती स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आंघोळ करताना मुलगी पडून डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे सांगत पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, वैद्यकीय अहवाल आणि पोलिसांच्या सखोल तपासामुळे ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
अपघाताचा बनाव उघड, शवविच्छेदन अहवालातून सत्य समोर :
समोर आलेल्या माहितीनुसार, कृष्णा राठोड यांच्या पत्नीने एका चिमुकल्या मुलीला जन्म दिला होता. ही मुलगी चौथी असल्याने आरोपी नाराज होता. सुरुवातीला मुलीला उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान 14 नोव्हेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती, त्यामुळे काही काळ या प्रकरणाकडे संशयाच्या नजरेने पाहिले गेले नव्हते.
मात्र, शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. वैद्यकीय तपासणीत मुलीचा मृत्यू अपघाती नसून टणक वस्तूच्या मारामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा पुन्हा सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान घटनाक्रमात विसंगती आढळून आली आणि अखेर आरोपी कृष्णा राठोड याने चौथी मुलगी झाल्याच्या रागातूनच आपण ही हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Newborn Girl Killed)
Jalgaon Crime News | पित्याची कबुली, हत्येचा गुन्हा दाखल :
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या मानसिकतेचा आणि कृत्याचा कोणताही पश्चात्ताप न दाखवता गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी पहूर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तब्बल दीड महिन्यानंतर सत्य बाहेर आल्याने या घटनेची तीव्रता अधिकच वाढली असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या अमानवी घटनेमुळे मोराड गावासह संपूर्ण जामनेर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. निष्पाप चिमुकलीला जन्म घेताच जीवन संपवावं लागणं, ही बाब समाजाला अंतर्मुख करणारी आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत गांभीर्याने केल्यामुळे सत्य समोर आले असले, तरी अशा घटना घडतच कशा राहतात, हा प्रश्न उपस्थित होत आहे.






