Irfan Pathan l आयपीएल 2025 च्या समालोचन पॅनलमध्ये एक मोठं नाव गायब आहे, आणि ते म्हणजे इरफान पठाण. अनेक वर्षांपासून प्रत्येक मोठ्या क्रिकेट स्पर्धेत आवाज गाजवणारा इरफान यावेळी समालोचकांच्या यादीत दिसून आला नाही. त्यामुळे त्याच्या हकालपट्टीबाबत चर्चांना उधाण आलं आहे.
या पार्श्वभूमीवर, एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात इरफान पठाणने विराट कोहलीवर थेट टीका केल्याचं दिसत आहे. अनेकांच्या मते, हीच टीका त्याच्या कॉमेंट्रीवरून वगळण्यामागचं मुख्य कारण ठरली आहे.
विराट कोहलीवर टीका काय होती? :
व्हायरल व्हिडीओमध्ये इरफान म्हणतो, “विराट कोहलीने घरगुती क्रिकेटमध्ये शेवटचा सामना एक दशकापूर्वी खेळला होता. 2024 मध्ये पहिल्या डावात त्याची सरासरी फक्त 15 होती. असे वरिष्ठ खेळाडू संघात हवेत का, याचा विचार व्हायला हवा. एखाद्या युवा खेळाडूला संधी दिल्यास तोही 25-30 ची सरासरी देऊ शकतो,” असे त्याचे स्पष्ट मत व्हिडीओत ऐकायला मिळते.
त्याचवेळी इरफानने रोहित शर्मावरही सूचक टीका केली होती, ज्यामुळे काही मंडळींमध्ये नाराजी निर्माण झाली. विशेष म्हणजे, इरफान पठाण गौतम गंभीरच्या जवळचा असल्याचीही चर्चा रंगली आहे.
Irfan Pathan l नेटकऱ्यांची प्रतिक्रिया; दुहेरी भूमिका का? :
इरफान पठाणला कॉमेंट्री पॅनलमधून वगळल्यावर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी बीसीसीआयवर दुहेरी भूमिकेचा आरोप केला आहे. “सुनील गावस्कर, रवी शास्त्री, कपिल देवही टीका करत असतात. मग त्यांच्यावर कारवाई का नाही?” असा सवाल केला जात आहे.
View this post on Instagram
काही जण म्हणतात की, “इरफान पठाण कठोर पण वस्तुनिष्ठ भाष्य करतो, जे काहींना रुचत नाही.” त्यामुळे तो ‘खेळातील राजकारणाचा बळी’ ठरत असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.






