Indian Navy | भारत आणि पाकिस्तानमधील वाढता संघर्ष आता अधिक गंभीर रूप धारण करत आहे. या दोन्ही देशांमधील तणावामुळे युद्धाच्या परिस्थितीत कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी भारतीय नौदलाने (Indian Navy) एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नौदलाने नागरिकांसह मच्छिमारांनाही (fishermen) समुद्राजवळ न जाण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. विशेषतः सुट्ट्यांमध्ये किंवा इतर कोणत्याही कारणास्तव समुद्रकिनारी जाणे टाळण्याचे आवाहन नौदलाने केले आहे.
समुद्राच्या मार्गे घुसखोरीचा धोका
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) चालवले आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईमुळे पाकिस्तान अधिक आक्रमक झाला असून, त्यांनी भारतावर प्रतिहल्ला सुरू केला आहे. मात्र, भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानचे सर्व हल्ले मोठ्या धैर्याने आणि ताकदीने परतवून लावले आहेत. भारताने पाकिस्तानचे ड्रोन आणि त्यांची हवाई सुरक्षा यंत्रणाही (air defence system) नष्ट केली आहे. असे असूनही, पाकिस्तानच्या कुरापती थांबलेल्या नाहीत. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, पाकिस्तान आता २६/११ च्या मुंबई हल्ल्याप्रमाणे (26/11 Mumbai attacks) समुद्राच्या मार्गाने भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे.
मच्छिमारांना समुद्रावर जाण्यास बंदी
२६/११ च्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर समुद्रातून घुसखोरीचा धोका लक्षात घेता, भारत-पाकिस्तान युद्धाच्या शक्यतेमुळे मुंबईतील मच्छिमारांसोबत नौदलाची एक तातडीची बैठक झाली. या बैठकीत नौदल ठिकाणे आणि संवेदनशील क्षेत्रांजवळ मच्छिमारीसाठी न जाण्याच्या स्पष्ट सूचना मच्छिमारांना देण्यात आल्या आहेत. नौदलाने निश्चित केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात कोणतीही व्यक्ती आढळल्यास, त्यांच्यावर थेट गोळीबार करण्याचे आदेश (shoot to kill) जारी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
सागरी सुरक्षेच्या दृष्टीने समुद्रकिनाऱ्याजवळ न जाण्याचा इशाराही जारी करण्यात आला आहे. लवकरच मुंबईतील सर्व मच्छिमार बोटींचे सर्वेक्षण करून एका विशेष ॲपच्या (app) मदतीने त्यांचा डेटा जमा केला जाणार आहे. सध्या पाकिस्तानने गुजरातच्या (Gujarat) काही मच्छिमार बोटी ताब्यात घेतल्या असून, मच्छिमारांना सोडून बोटी जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. २६/११ च्या हल्ल्याप्रमाणे या बोटींचा वापर पाकिस्तानकडून घातपाती कृत्यांसाठी केला जाण्याची शक्यता असल्याने नौदलाने हाय अलर्ट (high alert) जारी केला आहे.
फक्त मुंबईच नव्हे, तर कोकण (Konkan) आणि देशातील इतर महत्त्वाच्या किनाऱ्यांच्या बाबतीतही सध्या विशेष सतर्कता बाळगली जात आहे. कोकणातील किनारी भागात संरक्षण दलाच्या हालचाली वाढल्या असून, तिथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, कोणत्याही संशयित बोटी किंवा हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.
Title : Avoid Beaches, Sea Travel; Navy’s Clear Warning to Citizens and Fishermen






