ICMR Report | जगभरात प्रसिद्ध असलेली भारतीय खाद्यसंस्कृती तिच्या चवीसाठी आणि विविधतेसाठी ओळखली जाते. मात्र, इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (NIN) यांनी प्रसिद्ध केलेल्या एका ताज्या अहवालानुसार, हेच चवदार भारतीय जेवण आपल्या आरोग्यासाठी एक मोठा धोका बनत चालले आहे. या अहवालाने भारतीय आहार पद्धतीमधील एका मोठ्या असंतुलनावर प्रकाश टाकला आहे, ज्यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका वाढत आहे.
पोट भरतंय, पण पोषण मिळतंय का?
आयसीएमआरच्या अहवालानुसार, भारतीयांच्या दैनंदिन आहारात तब्बल ६५ ते ७० टक्के कर्बोदके (Carbohydrates) असतात, तर प्रथिनांचे (Protein) प्रमाण केवळ १० टक्के इतकेच आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की, आपले पोट तर भरत आहे, पण शरीराला आवश्यक असलेले पोषक घटक मिळत नाहीत. भारतीय थाळीमध्ये भात, चपाती, बटाटे यांसारख्या पदार्थांचा अधिक समावेश असतो, जे कर्बोदकांचे मुख्य स्रोत आहेत. या पदार्थांच्या अतिसेवनामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढते, ज्यामुळे शरीर अतिरिक्त चरबी साठवू लागते. परिणामी, स्थूलता, मधुमेह आणि सततचा थकवा यांसारख्या समस्या वाढीस लागतात.
याउलट, शरीरासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या प्रथिनांची मोठी कमतरता आपल्या आहारात आहे. अहवालानुसार, एक सामान्य भारतीय व्यक्ती दिवसाला केवळ ३५ ते ४० ग्रॅम प्रथिनांचे सेवन करते, तर प्रत्यक्षात ही गरज किमान ६० ग्रॅम इतकी आहे. डाळ, दूध, अंडी आणि सोयाबीन यांसारखे प्रथिनांनी समृद्ध असलेले पदार्थ बहुतांश भारतीयांच्या ताटातून गायब होत चालले आहेत. याचा थेट परिणाम रोगप्रतिकारक शक्ती आणि स्नायूंच्या ताकदीवर होत असून, अशक्तपणा आणि स्नायू कमकुवत होण्याच्या समस्या वाढत आहेत. प्रादेशिक पातळीवर आहारात फरक असला तरी, हे असंतुलन देशभरात दिसून येत आहे.
ICMR चा मोलाचा सल्ला
आयसीएमआरने आहार सवयींमध्ये तातडीने बदल करण्याचा गंभीर इशारा दिला आहे. जर आहारात धान्यासोबत प्रथिने आणि आरोग्यदायी स्निग्ध पदार्थांचा (Healthy Fats) योग्य समावेश केला नाही, तर भविष्यात गंभीर आजार शरीरावर आघात करू शकतात. या धोक्यापासून वाचण्यासाठी, आपल्या ताटात योग्य संतुलन राखणे अत्यंत गरजेचे आहे.
अहवालानुसार, एका व्यक्तीच्या ताटात ५० टक्के कर्बोदके, २५ टक्के प्रथिने आणि २५ टक्के आरोग्यदायी स्निग्ध घटक असणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या दैनंदिन आहारात दूध, दही, डाळी, अंडी आणि सोयाबीन यांसारख्या पदार्थांचा समावेश करणे अनिवार्य आहे. या छोट्या बदलांमुळे केवळ चवच नाही, तर आरोग्यही जपले जाईल आणि भविष्यातील मोठ्या आजारांचा धोका टाळता येईल.






