India Drone Attack Pakistan | भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानने भारतातील १५ शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, ज्याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले. भारताने पाकिस्तानमधील १२ शहरांवर ५० ड्रोन हल्ले चढवले. या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानच्या महत्त्वाच्या शहरांमधील हवाई सुरक्षा यंत्रणा (air defence system) उद्ध्वस्त झाली. विशेष बाब म्हणजे, पाकिस्तानच्या लष्कराने अणुबॉम्ब ठेवलेल्या शहरांमध्ये भारताने हे ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यामुळे पाकिस्तानची हवाई सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे आणि पाकिस्तानात मोठी खळबळ उडाली आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढलेला तणाव पाहता अमेरिका (America) आणि ब्रिटनसारख्या (Britain) मोठ्या देशांनी त्यांच्या नागरिकांना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये प्रवास न करण्याचा सल्ला दिला होता. यानंतर आता अमेरिकेने पाकिस्तानातील आपल्या नागरिकांना तातडीने लाहोर (Lahore) शहर सोडण्याचा आणि आपले प्राण वाचवण्याचा महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे.
दहशतवाद्यांची ९ तळे उद्ध्वस्त
पहलगाम (Pahalgam) येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने बुधवारी रात्री पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त केले, ज्यामुळे पाकिस्तानचा जळफळाट झाला. पहलगामच्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी अनेक महिलांचे सौभाग्य हिरावून घेतले आणि अनेक कुटुंबातील कर्त्या पुरुषांना लक्ष्य केले. या हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा बळी गेला. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) राबवून दहशतवाद्यांची ९ प्रशिक्षण केंद्रे उद्ध्वस्त केली.
भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तान अधिकच बिथरला आणि त्यांनी सीमाभागात अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या गोळीबारात सीमाभागातील गावातील १५ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, पाकिस्तानने क्षेपणास्त्रांच्या (missiles) माध्यमातून भारताच्या १५ लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारताने आज पहिल्यांदाच एस-४०० (S-400) या आधुनिक सुरक्षा प्रणालीचा वापर करून पाकिस्तानचे हल्ले परतवून लावले. यानंतर कच्छ (Kutch) येथे पाकिस्तानचे एक क्षेपणास्त्र सापडले, तसेच अमृतसरमध्येही (Amritsar) क्षेपणास्त्रांचे अवशेष आढळले. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारताने कठोर प्रत्युत्तर दिले. भारताने पाकिस्तानच्या १२ हवाई सुरक्षा यंत्रणा उद्ध्वस्त केल्या.
लष्करी मुख्यालयावर ड्रोन हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, भारताकडून पाकिस्तानच्या रावळपिंडीतील (Rawalpindi) लष्करी मुख्यालयावर ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या अणुबॉम्ब असलेल्या शहरांवर हल्ला करण्यात आला असून, भारतीय लष्कराने पाकिस्तानची रडार यंत्रणाही उद्ध्वस्त केली आहे. पाकिस्तानमधील अनेक शहरांतील हवाई सुरक्षा यंत्रणांवर अचूक हल्ले करण्यात आले आहेत.
Title : India Attacks Cities with Nuclear Bombs, America Says, ‘Leave Lahore and Save Your Lives’






