Independence Day 2025 | भारताने आज 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. 1947 साली याच दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळाले होते, त्यानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांनी सलग 12 व्या वर्षी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. ध्वजारोहणानंतर 21 तोफांची सलामी देण्यात आली आणि पंतप्रधानांनी देशवासीयांना संबोधित करत 2047 पर्यंत समृद्ध, सुरक्षित आणि आत्मनिर्भर भारत उभारण्याचे ध्येय स्पष्ट केले. (Independence Day 2025)
यंदाचा स्वातंत्र्य दिन ‘नवा भारत’ या थीमवर आधारित असून, ही थीम विकसित भारताच्या संकल्पनेशी जोडलेली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “स्वातंत्र्यदिन हा आपल्या देशाच्या ऐक्य, शौर्य आणि प्रगतीचा उत्सव आहे.” या सोहळ्यापूर्वी त्यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना अभिवादन केले.
विशेष पाहुण्यांचा गौरव आणि ‘ऑपरेशन सिंदूर’चा सन्मान :
यंदाच्या सोहळ्यासाठी देशभरातून 5000 हून अधिक विशेष पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये स्पेशल ऑलिंपिक्स 2025 चे खेळाडू, शेतकरी, युवा लेखक, स्वच्छता कर्मचारी आणि 85 सरपंचांचा समावेश होता. राष्ट्रगीत सादर करणाऱ्या बँडमध्ये पहिल्यांदाच अग्निवीरांचा सहभाग असल्याने विशेष उत्साह पाहायला मिळाला.
सोहळ्यात ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाचाही गौरव करण्यात आला. या मोहिमेत भारतीय जवानांनी दाखवलेले शौर्य आणि धैर्य पंतप्रधानांनी देशवासीयांसमोर मांडले. त्यांनी सांगितले की, “ऑपरेशन सिंदूर हे देशाच्या सुरक्षिततेचे आणि सैनिकांच्या अद्वितीय पराक्रमाचे प्रतीक आहे.” (Independence Day 2025)
Independence Day 2025 | सुरक्षा आणि देशव्यापी कार्यक्रमांची रेलचेल
लाल किल्ल्यावरच्या मुख्य सोहळ्यासाठी 11,000 हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते, ज्यामध्ये साडेसात हजारांहून अधिक जवान आणि स्नायपर यांचा समावेश होता. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दिल्ली पोलिसांनी सकाळी 4 ते 10 वाजेपर्यंत काही मार्गांवर वाहतूक बंद ठेवली होती.
देशभरातील शासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे आणि ऐतिहासिक इमारती तिरंगी रोषणाईने उजळून निघाल्या. शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संघटनांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय विषयांवर भाष्य करत देशवासीयांना स्वावलंबन आणि प्रगतीच्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले.






