Pune News Update | खडकवासला ते फुरसुंगी या मार्गावर तब्बल २८ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार होणार असून, या कामासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण मंडळाकडून जलसंपदा विभागाला लेखी मान्यता मिळाली आहे. या बोगद्याच्या कामासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळाल्या असून, पहिल्या टप्प्यात वडाची वाडी आणि उरळी देवाची येथे खोदकाम युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकल्पामुळे पाणीपुरवठा अधिक सुलभ आणि जलनाश कमी होण्यास मदत होणार आहे.
खडकवासला ते फुरसुंगी बोगद्याला हिरवा कंदील
खडकवासला ते फुरसुंगी कालव्यापर्यंत बोगद्याचे काम हे जलसंपदा विभागाच्या नव्या मुठा उजवा कालवा प्रकल्पांतर्गत सुरू आहे. सध्याचा कालवा सुमारे 34 किमी लांबीचा असून, त्याच्या दोन्ही बाजूंना अतिक्रमण, झोपडपट्ट्या आणि प्रदूषणामुळे कालव्याची वहनक्षमता २००० क्यूसेकवरून १२०० क्यूसेकपर्यंत खाली आली होती. या पार्श्वभूमीवर पाण्याची गळती, चोरी आणि बाष्पीभवन कमी करण्यासाठी बोगदा उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
केंद्र सरकारच्या पर्यावरण मंडळाने या प्रकल्पाला अखेर मान्यता दिल्याने कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. हैदराबाद येथील कंपनीला या प्रकल्पाचे काम देण्यात आले असून, पुढील अडीच ते तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कंपनीने ब्लास्टिंगसाठी पोलिस विभाग आणि इतर संबंधित खात्यांकडून आवश्यक परवानग्या मिळवल्या आहेत. तसेच आरएमसी प्लांट, क्रशर, पोकलेन, ट्रिपर आणि ‘क्वालिटी कंट्रोल विंग’ सुरू करून गुणवत्तेवर काटेकोर लक्ष ठेवले जात आहे.
Pune News Update | बोगद्याची रचना आणि कामाची प्रगती
या बोगद्याचा व्यास ६.३ मीटर इतका असणार असून, आतील भाग सिमेंट काँक्रिटने अस्तरित करण्यात येईल. रॉक बोल्ट, शॉक क्रिट यांसारख्या आधुनिक उपाययोजना बोगद्याच्या मजबुतीसाठी वापरल्या जात आहेत. पहिल्या टप्प्यात वडाची वाडी ते उरळी देवाची या भागात खोदकाम सुरू असून, पुढील टप्प्यात कात्रज आणि धायरी भागात काम सुरू होणार आहे.
कात्रज येथे जांभूळवाडीजवळ बोगदा तयार केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून १५० कामगार पुण्यात आणण्यात आले आहेत. त्यामध्ये अभियंते, प्रकल्प व्यवस्थापक आणि तांत्रिक कर्मचारी यांचा समावेश आहे. ‘ड्रिल अँड ब्लास्ट’ पद्धतीने खोदाईचे काम सुरू असून, सध्या बोगद्याच्या पहिल्या टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे.
जलसंपदा विभागाचे अधिकारी सांगतात की, येत्या तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्णत्वास नेला जाईल आणि त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत ऐतिहासिक बदल घडेल.






