IMD Weather Alert | राज्यातील थंडीचा कडाका काहीसा कमी झाला असला, तरी वातावरणात अजूनही गारवा कायम आहे. काही भागांमध्ये तापमानात थोडी वाढ झाल्याने नागरिकांना दिलासा मिळत असला, तरी हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. सकाळच्या वेळी धुके वाढत असून दृश्यमानता कमी होत असल्याने दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम जाणवत आहे.
दरम्यान, देशभरात हिवाळ्याचा प्रभाव वाढत असताना भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) अनेक राज्यांसाठी दाट धुके, शीतलहरी आणि तापमानात घसरणीचा इशारा जारी केला आहे. आगामी काही दिवस हवामानाच्या दृष्टीने संवेदनशील असणार असल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (IMD Weather Alert)
उत्तर भारतात धुके आणि थंड दिवसांचा धोका :
आयएमडीच्या अलर्टनुसार पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये पहाटेच्या वेळी दाट ते अतिदाट धुक्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील काही भागांत अत्यंत थंड दिवस अनुभवायला मिळू शकतात. बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्येही दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. (Cold Wave)
राजधानी दिल्लीत सलग अनेक दिवस दाट धुक्याची चादर पसरलेली असून, दृश्यमानता कमी झाल्याने विमानसेवा आणि वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. काही उड्डाणे रद्द करण्यात आली असून, प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
IMD Weather Alert | महाराष्ट्रातील हवामान कसं असेल? :
महाराष्ट्रात काही भागांत थंडीची लाट जाणवणार असली, तरी काही ठिकाणी कोरडं हवामान राहण्याचा अंदाज आहे. मुंबई व उपनगरांमध्ये आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असून किमान तापमान 18 तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. (IMD Weather Alert)
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर भागांत गारवा काहीसा कमी होईल. मात्र पुण्यात सकाळच्या वेळी धुकं दिसून येईल आणि किमान तापमान 10 अंशांच्या आसपास राहील. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 9 ते 10 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज आहे.






