IMD Weather Alert | महाराष्ट्रात पुन्हा एकदा निसर्गाने आपला रौद्र अवतार दाखवायला सुरुवात केली आहे. राज्यात सलग काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, आजही पावसाचे सावट कायम आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) पुढील २४ तासांसाठी यलो आणि हाय अलर्ट जारी करत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबई, कोकण, नाशिक, धुळे, जळगाव, विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra IMD Weather Alert)
रात्रभर मुंबई आणि आसपासच्या भागात पावसाचा जोर कायम राहिला. आज सकाळीही ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना पावसाचा तडाखा बसत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी वर्गात प्रचंड चिंता आहे. दिवाळीनंतरही पावसाने शेतकऱ्यांचा पिच्छा सोडलेला नाही.
चक्रीवादळाचा परिणाम कायम, नवीन कमी दाबाचा पट्टा निर्माण :
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मोंथा चक्रीवादळाचा परिणाम अजूनही कायम आहे. या वादळामुळे पूर्व किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रावर दिसून येत आहे. कोकण, मुंबई, रायगड, ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पुढील २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे. (weather update)
IMD च्या अंदाजानुसार, मुंबईत आज हलक्या ते जोरदार पावसाचा संभव आहे. जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. समुद्र किनाऱ्यांवर मच्छीमारांना पुढील आदेश येईपर्यंत समुद्रात न जाण्याचे निर्देश दिले आहेत.
IMD Weather Alert | शेतकऱ्यांवर डबल फटका :
सततच्या पावसाने शेतकरी राजाचे हाल अक्षरशः कंगाल केले आहेत. गोंदिया, भंडारा, जालना, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये कापणी केलेल्या धानाला शेतातच अंकुर फुटले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.
जालना जिल्ह्यातील शेतकरी अद्यापही अतिवृष्टी अनुदानापासून वंचित आहेत. दिवाळीनंतर मदत मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एकही रुपया न आल्याने नाराजीचं वातावरण आहे.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी? :
प्रशासनाने नागरिकांना शक्यतो घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. नाल्यांजवळ किंवा पाण्याने भरलेल्या भागात जाणे टाळा, तसेच विजांच्या गडगडाटाच्या वेळी झाडाखाली उभं राहू नका. मुंबई, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील शाळांना पावसामुळे सुट्टी देण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राज्यातील पावसाचा हा हंगाम अजून दोन दिवस सुरू राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे पुढील २४ तास राज्यासाठी अतिशय निर्णायक आणि धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.






