Bandu Andekar Arrest | पुण्यातील आयुष कोमकर हत्याकांडानंतर आंदेकर टोळीवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. ५ सप्टेंबर रोजी नाना पेठ परिसरात झालेल्या या हत्येमुळे शहरात पुन्हा टोळीयुद्धाचे सावट निर्माण झाले होते. अमन पठाण आणि यश पाटील या शार्पशूटर्सनी आयुषवर तब्बल ११ गोळ्या झाडल्या, त्यापैकी नऊ गोळ्या शरीरात लागल्याने जागीच त्याचा मृत्यू झाला. (Ayush Komkar Murder)
या घटनेनंतर आयुषची आई कल्याणी कोमकरने बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीवर गुन्हा दाखल केला. मात्र गुन्हा दाखल होण्याआधीच आंदेकर कुटुंब फरार झाले. गणेशोत्सवाचा काळ आणि खुनाची गंभीर घटना या दोन्हींचा ताण सांभाळत पोलिसांनी हे आव्हान स्विकारले.
तीन दिवसांची गुप्त पाळत :
गुन्ह्यानंतर आंदेकर टोळीला पकडणे हे मोठे आव्हान होते. पोलिसांनी आंदेकर कुटुंबाच्या हालचालींवर तीन दिवस गुप्त पाळत ठेवली. त्यांच्या लपण्याच्या जागांवर सतत लक्ष ठेवले गेले. शेवटी योग्य वेळी सापळा रचून बंडू आंदेकरसह सहा जणांना महाराष्ट्राबाहेरून अटक करण्यात आली. (Ayush Komkar Murder)
सोमवारी वैकुंठ स्मशानभूमीत मोठ्या पोलीस बंदोबस्तात आयुष कोमकरचा अंत्यसंस्कार पार पडला. त्यानंतर काही तासांतच पोलिसांनी टोळीवर झडप घातली. बंडू आंदेकर, स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, त्यांची आई आणि आणखी दोन जणांना अटक करण्यात आली. यापूर्वीच यश पाटील आणि अमित पोटोळे यांना अटक झाली होती. त्यामुळे अटकेतील आरोपींची संख्या आता आठवर पोहोचली आहे.
Bandu Andekar Arrest | आरोपींवर दाखल गुन्हा :
या प्रकरणात एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू अण्णा आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर, पुतण्या शिवम आंदेकर, नातू स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, वृंदावनी वाडेकर, लक्ष्मी आंदेकर, अमन पठाण, यश पाटील आदींचा समावेश आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर या टोळीचा मोठा प्रभाव कमी झाला असला तरी इतर आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे.
ही हत्या म्हणजे वनराज आंदेकर खून प्रकरणाचा बदला असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. मागील वर्षी १ सप्टेंबर रोजी वनराज आंदेकरची कोयत्याने वार करून आणि गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात गणेश कोमकर आणि त्याचे कुटुंबीयांसह १६ जणांना अटक झाली होती. याच वैरातून आंदेकर टोळीने गणेश कोमकरचा मुलगा आयुष याचा बळी घेतला.






