Hingoli News | हिंगोली जिल्ह्यातील शिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण आणि त्यांचे कुटुंब तब्बल 40 तास बेपत्ता राहिल्यामुळे नातेवाईक, मित्रपरिवार आणि गावकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, अखेर आज (28 ऑगस्ट) सकाळी 9 वाजून 50 मिनिटांनी त्यांचा शोध लागला असून ते सर्वजण सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. (Dnyaneshwar Chavan & Family)
काय घडलं होतं नेमकं? :
ज्ञानेश्वर चव्हाण हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह गणपतीनिमित्त गावी जात होते. प्रवासादरम्यान कुंभार्ली घाटात मुसळधार पाऊस सुरू होता. या पावसात कुटुंबातील मोबाईल फोन पूर्णपणे भिजले आणि दोन्ही मोबाईल बंद पडले. त्यामुळे चव्हाण कुटुंबाशी कोणताही संपर्क साधता आला नाही.
दरम्यान, नातेवाईक व परिचितांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. कुणाशीच संपर्क होत नसल्याने सर्वजण मोठ्या चिंतेत होते. हा प्रकार माध्यमांतूनही झळकला आणि परिसरात खळबळ उडाली.
Hingoli News | गोंदवले महाराज मठात मुक्काम :
मोबाईल बंद झाल्यामुळे संपर्क होत नसतानाही चव्हाण कुटुंब गावी न जाता गोंदवले महाराज मठ, तालुका माण येथे मुक्कामी थांबले. कालपासून ते तिथेच होते. आज त्यांनी संपर्क साधल्यानंतर सर्वांना दिलासा मिळाला.
ज्ञानेश्वर चव्हाण यांनी व्हिडीओ संदेश जारी करून सांगितले, “गणपतीच्या सुट्ट्या असल्यामुळे आम्ही रत्नागिरीहून गावाकडे जात असताना अचानक कुंभार्ली घाटाजवळ मुसळधार पाऊस झाला. मोबाईल पाण्यात भिजल्यामुळे दोन्ही मोबाईल बंद झाले. या काळात आम्ही गोंदवले महाराज मठात मुक्काम केला. मोबाईल बंद असल्यामुळे आमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना खूप त्रास झाला, त्याबद्दल मी माफी मागतो. मी आणि माझं कुटुंब सुखरूप आहोत.” (Dnyaneshwar Chavan & Family)
या घटनेमुळे तब्बल 40 तास चिंतेत घालवणाऱ्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्ञानेश्वर चव्हाण कुटुंबाच्या सुखरूप परतीने हिंगोलीत आनंदाचे वातावरण पसरले आहे.






