Maharashtra Heatwave Alert | राज्यातील हवामानात सध्या मोठे चढ-उतार पाहायला मिळत असून नागरिकांपुढे उष्णता आणि पावसाचे दुहेरी आव्हान उभे ठाकले आहे. तापमान झपाट्याने वाढल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट पसरली आहे. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देत अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
उष्णतेची लाट, तापमानाचा विक्रमी पारा :
भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) राज्यातील 15 हून अधिक जिल्ह्यांसाठी उष्णतेचा इशारा जारी केला आहे. काही ठिकाणी तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अमरावती (Amravati) आणि अकोला (Akola) येथे तब्बल 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर चंद्रपूर (Chandrapur), नागपूर (Nagpur), सोलापूर (Solapur), मालेगाव (Malegaon), गडचिरोली (Gadchiroli) आणि यवतमाळ (Yavatmal) या भागांमध्ये 43 अंशांपर्यंत पारा गेला आहे.
वाशिम (Washim) जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून तापमान सातत्याने वाढत असून ते 43.4 अंशांपर्यंत पोहोचले आहे. या तीव्र उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असून उष्माघाताची लक्षणे दिसू लागली आहेत. नेहमी उन्हापासून बचावासाठी बाहेर पडणारे लोकही सध्या घरातच राहणे पसंत करत आहेत. मराठवाडा आणि विदर्भ भागासाठी येलो अलर्ट देण्यात आला असून परिस्थिती गंभीर बनत चालली आहे.
Maharashtra Heatwave Alert | पावसाचा इशारा, शाळांना सुट्टी :
दुसरीकडे काही भागांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून कोकण (Konkan) आणि धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या बदलत्या हवामानामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, एकीकडे उष्णतेचा तडाखा कायम असल्याने प्रशासनाने सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
नागपूर (Nagpur) जिल्ह्यात 18 एप्रिल रोजी शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. वाढत्या तापमानामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला. तसेच दुपारच्या वेळी बाहेर जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातही तापमान 43 अंशांवर पोहोचल्याने केळीच्या शेतीला मोठा फटका बसत असून पानं सुकून गळत असल्याचे चित्र आहे.






