Rajveer Jawanda Death | पंजाबी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध गायक आणि अभिनेता राजवीर जवंदा (Rajveer Jawanda) यांचे वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी निधन झाले आहे. शिमल्याला (Shimla) जाताना झालेल्या भीषण बाईक अपघातानंतर ते गेल्या बारा दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होते. अखेर बुधवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
बाईकवर झाला भीषण अपघात :
27 सप्टेंबर 2025 रोजी राजवीर बाईकवरून बद्दीहून शिमल्याकडे निघाले होते. पिंजौर परिसरात त्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांना डोक्याला आणि पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर त्यांना रुग्णालयात नेले जात असतानाच हृदयविकाराचा (Heart Attack) झटका आला. त्यानंतर त्यांना मोहाली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या बारा दिवसांपासून ते आयसीयूमध्ये (ICU) व्हेंटिलेटरवर उपचार घेत होते. मात्र, अखेर डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही आणि बुधवारी त्यांचे निधन झाले.
राजवीर जवंदाच्या निधनानंतर संपूर्ण पंजाबी कलाविश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्री नीरू बाजवा हिने सोशल मीडियावर लिहिले – “एका तरुण आणि प्रतिभावान कलाकाराच्या निधनाने मला फार मोठा धक्का बसला आहे. राजवीरच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करते. तो आम्हाला खूप लवकर सोडून गेला, पण त्याला विसरता येणार नाही.”
पंजाबच्या कलाविश्वावर दुःखाचा डोंगर :
अभिनेता गुरप्रीत घुग्गी म्हणाला, “मृत्यू जिंकला, तारुण्य हरलं… छोट्या भावाला आम्ही कधीच विसरणार नाही.” तर अभिनेता बी.एन. शर्मा यांनीही पोस्ट लिहून राजवीरला श्रद्धांजली वाहिली आहे.
काही दिवसांपूर्वीच सुप्रसिद्ध गायक दिलजीत डोसांझ (Diljeet Dosanjh) यांनी आपल्या लाईव्ह शोदरम्यान राजवीरच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली होती. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच रुग्णालयाबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी जमली, त्यामुळे पोलिसांना सुरक्षा वाढवावी लागली.
राजवीरच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी पौना येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. राजवीर जवंदाने ‘सरदारी’, ‘जोर’, ‘कली जवंदे दी’, ‘रब करके’ आणि ‘मेरा दिल’ यांसारखी गाणी गायली आहेत. उत्तम गायकासोबतच तो दमदार अभिनेतासुद्धा होता. त्याने ‘जिंद जान’, ‘सुभेदार जोगिंदर सिंह’, ‘मिंदो तसीलदारनी’ आणि ‘काका जी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
राजवीरच्या अकाली जाण्याने पंजाबी संगीत आणि चित्रपटसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. चाहत्यांच्या मनात त्यांची गाणी आणि आठवणी कायम जिवंत राहतील.






