Gauri Garje Death Case | गौरी पालवे-गर्जे (Gauri Garje) यांच्या मृत्यूला काही दिवस उलटले असले तरी या प्रकरणातील धक्कादायक आरोप आणि घडामोडींमुळे राज्यात राजकीय आणि सामाजिक पातळीवर मोठी चर्चा रंगली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या पीए असलेल्या अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी यांनी वरळीतील फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा दावा पतीने केला. मात्र तिच्या कुटुंबियांनी हा संपूर्ण प्रकार आत्महत्या नसून खून असल्याचा गंभीर आरोप करत न्यायालयीन आणि पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. (Gauri Garje Death Case)
लग्नाला अवघे दहा महिने झालेले असताना गौरीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा धक्का अजूनही शांत झालेला नाही. पण “आमची मुलगी असे करूच शकत नाही” असा ठाम दावा करत कुटुंबियांनी घटनास्थळावरील संशयास्पद गोष्टी, तिच्या शरीरावरील जखमा आणि कथित राजकीय दबावाचे मुद्दे मांडले आहेत.
दमानिया यांचे आरोप : “हा आत्महत्या नव्हे, स्पष्ट खून आहे” :
या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया स्वतः पुढे येत अत्यंत गंभीर आरोप करत आहेत. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अनेक संशयास्पद मुद्द्यांवर प्रकाश टाकला. दमानिया म्हणाल्या, “गौरी जेव्हा मृतावस्थेत सापडली तेव्हा गळफासासाठी वापरलेला दुपट्टा वरून काढलेला होता. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी असताना सुभाष केकन नावाचा मावस भाऊ आत काय करत होता? त्याचा संबंध काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दमानिया यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. गौरी पंख्याला लटकलेली असताना गळ्याच्या भोवतीची गाठ सोडणे अपेक्षित होतं. पण पंख्यावरील गाठदेखील सोडण्यात आली. हे मान्य करण्यासारखेच नाही. तसेच नायर हॉस्पिटलच्या मॉर्च्युरीमध्ये गौरीच्या शरीरावर उजव्या बाजूला अनेक जखमा दिसल्या, पण पोलिसांच्या फोटोमध्ये त्या नसल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. “या प्रकरणात काहीतरी मोठं लपवलं जात आहे आणि राजकीय दबाव जाणवतोय,” असे दमानिया म्हणाल्या.
Gauri Garje Death Case | गौरीच्या वडिलांचा आक्रोश :
गौरीचे वडील माध्यमांसमोर अत्यंत भावूक झाले. “आम्ही ओरडून सांगतोय… आमची मुलगी असं पाऊल उचलूच शकत नाही. मग तिच्या मृत्यूला आत्महत्या का म्हणताय?” असा रोष त्यांनी व्यक्त केला. त्यांनी स्पष्ट सांगितले की, “हा सरळसरळ खून आहे. एकट्याने नाही तर दोघातिघांनी मिळून गळा दाबून तिला मारलं. आमचा ठाम आरोप आहे.” (Gauri Garje Death Case)
त्यांनी पोलिस तपासावरही नाराजी व्यक्त केली. “अनंत गर्जेला पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी देण्यात आली, हे चुकीचे आहे. परदेशातून आरोपी आणता, मग इथले आरोपी सापडत का नाहीत? फक्त अनंत नव्हे तर त्याची बहीण आणि भाऊ यांनाही अटक व्हावी,” अशी मागणी त्यांनी केली. माध्यमांना “खरं सत्य समोर आणा” अशी कळकळीची विनंती त्यांनी केली.






