Maharashtra Industrial Crisis | इराणवरील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरात इंधन आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे. या आंतरराष्ट्रीय तणावाचे परिणाम आता भारतातही जाणवू लागले आहेत. व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे काही औद्योगिक क्षेत्रांमध्ये उत्पादनावर गंभीर परिणाम झाला असून अनेक उद्योगांना बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
संभाजीनगरात उद्योगांवर गॅस संकट :
इराणवर (Iran) इस्राईल आणि अमेरिकेने युद्ध पुकारल्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला आहे. इराणकडून अनेक अरब देशांतील रिफायनरी तसेच गॅस प्रकल्पांवर लक्ष्य साधले गेले असून होर्मुज सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या इंधन वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत. या घडामोडींमुळे जगभरात इंधनाची टंचाई निर्माण झाली असून त्याचा परिणाम भारतातील गॅस पुरवठ्यावरही झाला आहे. परिणामी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्या असून व्यावसायिक गॅस वापरावर मर्यादा लागू झाल्या आहेत. (Maharashtra Industrial Crisis)
या परिस्थितीचा सर्वाधिक फटका छत्रपती संभाजीनगरमधील उद्योगांना बसत असल्याचे दिसत आहे. औद्योगिक क्षेत्राला लागणारा व्यावसायिक गॅस अचानक बंद झाल्यामुळे अनेक उद्योग गंभीर अडचणीत आले आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्र, औषधनिर्मिती कंपन्या तसेच स्टील उद्योग यांना उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर गॅसची आवश्यकता असते. मात्र पुरवठा थांबल्यामुळे उत्पादन प्रक्रिया थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे शहरातील पाच मोठ्या उद्योगांवर बंद होण्याची वेळ येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Maharashtra Industrial Crisis | जळगावातील उद्योगांनाही धोका :
गॅस टंचाईचा परिणाम केवळ संभाजीनगरपुरता (sambhajinagar) मर्यादित नसून इतर औद्योगिक भागांमध्येही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. जळगाव जिल्ह्यातही व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाल्याचे समोर आले आहे. छोट्या-मध्यम उद्योगांमध्ये या सिलेंडरवरच उत्पादन प्रक्रिया अवलंबून असल्यामुळे उद्योजकांमध्ये चिंता वाढली आहे. पुरवठा दीर्घकाळ बंद राहिला तर अनेक उद्योग बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जळगावमधील एमआयडीसी (MIDC) परिसरात चिक्की आणि गुळाचे लाडू तयार करणाऱ्या उद्योगांना दररोज साधारण १५ ते २० व्यावसायिक गॅस सिलेंडरची आवश्यकता असते. सध्या कंपन्यांकडून मर्यादित प्रमाणात सिलेंडर उपलब्ध होत असल्यामुळे उत्पादन सुरू आहे.
मात्र पुढील काही दिवसांत पुरवठा खंडित झाला तर कारखाने पूर्णपणे थांबण्याची शक्यता उद्योजकांनी व्यक्त केली आहे. उद्योग बंद पडल्यास त्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांवर बेरोजगारीचे संकट कोसळू शकते आणि त्यांच्या उपजीविकेवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी सीएमआयए (Chamber of Marathwada Industries and Agriculture) या संघटनेने मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून तातडीने गॅस पुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे.






