Jalna News | जालना जिल्ह्यात बनावट चलनाच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा अंबड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून तब्बल 1 लाख 22 हजार रुपयांच्या बनावट भारतीय चलनी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. ही घटना समोर येताच परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
अंबड शहर परिसरात 500 रुपयांच्या बनावट नोटांचा मोठ्या प्रमाणावर व्यवहार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालत आर्थिक व्यवहारांवर बारकाईने नजर ठेवण्यास सुरुवात केली. संशयास्पद हालचालींच्या आधारे पोलिसांनी विशेष पथक तयार करून शोधमोहीम आखली आणि योग्य संधी साधून आरोपींना जाळ्यात ओढले.
गुप्त माहितीवरून पोलिसांची धडक कारवाई :
अंबड-पाचोड रोड परिसरात दोन पंचांच्या उपस्थितीत पोलिसांनी शोधमोहीम राबवली. या कारवाईदरम्यान संशयित विकास अनिल गडगूळ (वय 26 वर्ष) आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले. पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांच्या जवळ 500 रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. या प्राथमिक कारवाईतूनच मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता पोलिसांना वाटू लागली.
पोलिस चौकशीत विकास गडगूळ याने या नोटा समरवीर सुनील खरात (वय 21 वर्ष) याच्याकडून घेतल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी समरवीर खरात यालाही ताब्यात घेतले. त्याच्याकडूनही बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून चौकशीदरम्यान त्याने आणखी दोन आरोपींची नावे उघड केली. यामुळे प्रकरणाचा तपास अधिक खोलात गेला.
Jalna News | 244 बनावट नोटा जप्त, मोठ्या साखळीचा संशय :
समरवीर खरात याने या नोटा आकाश नारायण शेळके (वय 28 वर्ष) आणि आदित्य सुमित गायकवाड (वय 19 वर्ष) यांच्याकडून मिळाल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले. सर्व आरोपींची पंचासमक्ष झडती घेतली असता 500 रुपयांच्या एकूण 244 बनावट नोटा सापडल्या असून त्यांची एकूण किंमत 1 लाख 22 हजार रुपये इतकी आहे.
या प्रकरणात अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांनी माहिती देताना सांगितले की, आरोपी बनावट चलनाचा वापर करून बाजारात आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न करत होते. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून या साखळीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. बनावट नोटांच्या व्यवहारामुळे अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होत असल्याने अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.






