Maharashtra Election | राज्यातील नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचाराला वेग आला असताना सर्वच पक्षांचे नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध मार्ग वापरताना दिसत आहेत. अशातच शिवसेना नेते व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केलेल्या एका विधानाने राज्यभरात मोठी चर्चा रंगली आहे. नाशिकमधील भगूर (Bhagur) येथे झालेल्या सभेत त्यांनी मतदारांना “मटण खा त्यांचं, पण बटण दाबा आमचं” असा सल्ला देत विरोधकांवर हल्लाबोल केला. (Maharashtra Election News)
निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना अनेक ठिकाणी भोजनाचे, मटणाचे आयोजन केले जाते, यावर भाष्य करताना पाटील यांनी विरोधकांकडे पैसा जास्त असला तरी जनता काम बघून मतदान करेल असे सांगितले. त्यांच्या या हटके विधानाची सभागृहात उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गडगडाटात दाद दिली असून आता हे वक्तव्य सोशल मीडियावरही वेगाने चर्चेत आहे.
शहर विकासाची निवडणूक, कामं पाहून मतदान होणार – पाटील :
भगूरमधील सभेत बोलताना पाटील म्हणाले की, “ही निवडणूक शहर विकासाची आहे. विरोधक कितीही एकत्र आले तरी जनता कामाला आणि प्रतिमेला मत देते.” त्यांनी भगूर नगरपालिका क्षेत्रात झालेल्या विकासकामांचा उल्लेख करत करंजकरांच्या कामगिरीचे कौतुक केले.
ते पुढे म्हणाले की, “पूर्वी बायको नवऱ्याकडे पैसे मागायची, आता नवरा बायकोकडे पैसे मागतो. अर्ध्या रात्री रक्त देणारे लोक आम्ही उभे केलेत. अशांना साथ द्या.” या विधानातून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या सामाजिक भूमिकेवरही प्रकाश टाकला.
यानंतर त्यांच्या सभेत काही वेगळे मुद्देही पुढे आले. निवडणूक जवळ आली की मतदारांवर विविध प्रकारचे प्रलोभन टाकले जातात, त्यावर पाटील म्हणाले की, “ते मटण देतील, मटण त्यांचे खा… पण बटण आमचं दाबा.” या विधानामुळे सभागृहात हास्याचा वर्षाव झाला.
Maharashtra Election | विरोधक पैसे देतील, पण जनता काम बघते – शिंदे गटाची रणनीती :
पुढे भाषणात त्यांनी विरोधकांवर टीका करत सांगितले की, “कुणाचा बँड वाजवायचा हे लोकांनी ठरवलंय. त्यांच्याकडे फक्त पैसा आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी लक्ष्मी आली होती, आता पुन्हा येईल. ते भांडण लावतील, मुसलमान बांधवांना सांगतील की शिवसेना हाबू आहे. पण शिवसेना जात-पात पाहत नाही.”
ते पुढे म्हणाले की, “आम्ही निवडून आलो, मंत्रीदेखील झालो. शिवसेना एकसंध आहे. रात्री चारपर्यंत सरकारचे काम करणारा नेता म्हणजे एकनाथ शिंदे.” (Eknath Shinde) त्यांनी आपल्या समाजातील सर्व घटकांसाठी केलेल्या कामांची यादी मांडत बौद्ध विहारासह अनेक योजनांचा उल्लेख केला.
सभेच्या शेवटी महायुतीबद्दल बोलताना पाटील म्हणाले, “पॉलिसी शिंदे साहेब ठरवतात. आम्ही आदेशावर चालणारे लोक आहोत. ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. आम्ही प्रचारात कुठेही टीका केली नाही. ते टीका करतील तरही आम्ही प्रत्युत्तर देणार नाही.” त्यांच्या या विधानातून महायुतीची प्रचार-धोरणे स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न दिसून आला.






