देशावर दुहेरी संकट! ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

On: February 25, 2026 12:11 PM
Maharashtra Weather Update
---Advertisement---

Maharashtra Weather Update | राज्यात सध्या हवामानाचा दुहेरी परिणाम जाणवत आहे. एका बाजूला उन्हाचा पारा 37 अंशांच्या पुढे गेला आहे, तर दुसऱ्या बाजूला काही भागांत वादळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) 25 फेब्रुवारीसाठी काही जिल्ह्यांना पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.

विदर्भात उष्णता आणि वादळी पावसाचा इशारा :

आग्नेय बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तसेच समुद्रसपाटीपासून सुमारे 3.1 किलोमीटर उंचीवर वाहणाऱ्या चक्राकार वाऱ्यांमुळे राज्यात बदलते हवामान निर्माण झाले आहे. दक्षिण कर्नाटकपासून मराठवाड्यापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने पावसासाठी पोषक स्थिती तयार झाली आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भात उन्हासोबतच ढगाळ वातावरण आणि विजांसह सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra Weather Update)

अकोला येथे 37.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले असून ते राज्यातील उच्चांकी ठरले आहे. नागपूर, अमरावती आणि गडचिरोलीमध्ये 34 ते 37 अंशांच्या दरम्यान कमाल तापमान राहण्याचा अंदाज आहे. विशेषतः यवतमाळ आणि चंद्रपूर येथे विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता असल्याने ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. उष्णतेसोबतच अचानक पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (Yellow Alert Vidarbha)

Maharashtra Weather Update | इतर विभागांत वेगवेगळे चित्र :

कोकण (Kokan) पट्ट्यात आकाश निरभ्र ते अंशतः ढगाळ राहील, तर मुंबई परिसरात 32 ते 34 अंश कमाल आणि 24 ते 25 अंश किमान तापमानाचा अंदाज आहे. सकाळी गारवा जाणवेल, मात्र दुपारी उन्हाची तीव्रता वाढेल. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये 32 ते 35 अंशांपर्यंत तापमान जाईल, तर किमान पारा 18 ते 22 अंशांच्या दरम्यान राहील. या भागात हवामान मुख्यतः कोरडे आणि उष्ण राहण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार येथे सकाळी आल्हाददायक वातावरण राहील; किमान तापमान 18 ते 21 अंशांदरम्यान असेल. मात्र दुपारनंतर 32 ते 34 अंशांपर्यंत वाढ अपेक्षित आहे. धुळे येथे 12.4 अंश सेल्सिअस इतके राज्यातील नीचांकी तापमान नोंदले गेले. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड (Nanded), परभणी, लातूर, बीड (Beed) आणि धाराशिव (Dharashiv) येथे 33 ते 36 अंशांदरम्यान कमाल तापमान राहील. देशातील सर्वाधिक तापमान 24 फेब्रुवारी रोजी तमिळनाडूतील एरोडे येथे 37.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर दुपारी घराबाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि विजांच्या कडकडाटावेळी सुरक्षित स्थळी थांबावे, असे प्रशासनाने सुचवले आहे.

News Title: Double whammy of weather in the state! Summer mercury crosses 37 degrees

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now