Dhananjay Munde | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी परळी (Parli) तालुक्यातील बोधेगाव (Bodhegaon) येथील एका कार्यक्रमात आपल्या आयुष्यातील एका अत्यंत कठीण काळाबद्दल भाष्य केले. एका घटनेवरून तब्बल २५० दिवस आपली मीडिया ट्रायल चालल्याचे सांगत, त्या काळात आपण दोनदा मरता मरता वाचलो होतो, असा भावनिक खुलासा त्यांनी केला.
‘माझा जन्म लोकांची सेवा करण्यासाठी’ :
बोधेगाव येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले, “ज्या घटनेशी माझा काहीही संबंध नव्हता, त्यावरून २५० दिवस इलेक्ट्रॉनिक मीडियावर माझी ट्रायल चालली. तो काळ अत्यंत कठीण होता. त्यातून मी दोनदा मरता मरता वाचलो.” आपण केवळ लोकांच्या आशीर्वादामुळेच आज त्यांच्यासमोर उभे असल्याचे सांगत, आता केवळ डोळ्याचा थोडा त्रास शिल्लक असल्याचे त्यांनी नमूद केले.
“त्या कठीण काळात मी कुठल्याही माध्यमांवर बोललो नाही. मी प्रामाणिकपणे सांगतो, मी सगळ्या आजारांतून बाहेर पडलो आहे, फक्त आता डोळ्याचे थोडे बाकी आहे. पण माझा जन्म लोकांची सेवा करण्यासाठी झाला आहे, म्हणूनच मी आज तुमच्यासमोर आहे. मला फक्त तुमची सेवा करायची आहे, दुसरे काही नाही,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.
Dhananjay Munde | विक्रमी विजय साजरा करता आला नाही :
यावेळी त्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील आपल्या विक्रमी विजयाचाही उल्लेख केला. “मायबाप जनतेने मला १ लाख ४२ हजार मतांच्या प्रचंड आघाडीने निवडून दिले, महाराष्ट्रात हा सर्वाधिक मताधिक्याचा विजय आहे. पण एवढा मोठा विजय मिळूनही, आलेल्या संकटांमुळे तो साजरा करता आला नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
ही संकटे अचानक आलेली नव्हती, ती ‘घडवून आणलेली’ होती, त्यामुळे त्यातून बाहेर पडणे अधिक कठीण होते, असे ते म्हणाले. आपल्याला मिळालेल्या मंत्रिपदाचा आनंदही घेता आला नाही, अशी वेदनाही त्यांनी यावेळी मांडली. बोधेगाव आणि पंचक्रोशीतील विकासकामांचे लोकार्पण करताना, भागाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन मुंडे यांनी दिले. लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद हीच आपली सर्वात मोठी ताकद असल्याचे सांगत त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.






